yuva MAharashtra निष्क्रिय अधिकारी बदलणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा !

निष्क्रिय अधिकारी बदलणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ फेब्रुवारी २०२५

जिल्ह्यातील अमली पदार्थ समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून, याप्रकरणी कुठलेही राजकीय किंवा प्रशासकीय दबाव स्वीकारले जाणार नाहीत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ड्रग्ज निर्मूलनासंदर्भात महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.

ड्रग्ज निर्मूलनासाठी कठोर उपाययोजना

पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे रोखण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहिम हाती घेतली असून, पोलिस विभाग, अन्न व औषध प्रशासन, तसेच औद्योगिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष टास्क फोर्सची स्थापना केली जाईल. या गटामध्ये समन्वय साधून कार्यवाही केली जाणार आहे.

यासोबतच जनजागृती आणि माहिती संकलनावर भर देण्यात येणार आहे. ड्रग्जविरोधी मोहिमेत मदत करणाऱ्या नागरिकांना गुप्तता राखून सन्मानित केले जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका मोहिमेत सहकार्य करणाऱ्या चार जणांना प्रत्येकी १०,००० रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.


निष्क्रिय अधिकाऱ्यांना बदलण्याचा इशारा

पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या आणि कार्यक्षमतेमध्ये अपयशी ठरणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची त्वरित बदली केली जाणार आहे. तसेच, ड्रग्ज प्रकरणांच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील.

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची तपासणी

अमली पदार्थांच्या गैरवापरास आळा घालण्यासाठी औद्योगिक क्षेत्रावरही नजर ठेवली जाणार आहे. विविध कारखान्यांचे परवाने, त्यांची वास्तविक उत्पादन प्रक्रिया आणि बंद पडलेल्या कारखान्यांचे उपयोग यांची कसून चौकशी केली जाईल. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकार ड्रग्ज निर्मूलनासाठी कटिबद्ध असून, कठोर कारवाईसाठी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडले जाणार नाही, असे पालकमंत्री पाटील यांनी ठामपणे सांगितले.