yuva MAharashtra पंचांशी भिडलेल्या शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे निलंबन, राज्य कुस्ती संघटनेचा निर्णय !

पंचांशी भिडलेल्या शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांचे निलंबन, राज्य कुस्ती संघटनेचा निर्णय !

फोटो सौजन्य  - gettyimages 

| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ३ फेब्रुवारी २०२५

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळी गोंधळाचे गालबोट लागले. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीतच हा गोंधळ झाला. यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी बनला आहे. मात्र यानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत राज्य कुस्ती संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी सांगितले की, या धक्कादायक प्रकारानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांनीही पंचाशी वाद घातला. यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने शिवराजला ढाक डाव टाकून चितपट केले. पंचांनी मोहोळला विजयी जाहीर केले. त्यानंतर पृथ्वीराजच्या समर्थकांनी त्याला उचलून घेत जल्लोष केला. शिवराजने या निर्णयाला आव्हान दिले. त्याचे प्रशिक्षकही 'चॅलेंज' स्वीकारा अशी मागणी करत होते. पण पंचांनी त्यांचे आव्हान फेटाळून लावले. शिवराज हा कुस्ती महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप अप्पा भोंडवे यांच्याकडे दाद मागत होता. ते त्याची समजूत काढत होते, पण चिडलेल्या शिवराजने काहीच ऐकले नाही. 

चिडलेल्या शिवराजने पंच दत्ता माने यांची कॉलर पकडून त्यांना लाथ मारली. त्यात ते खाली कोसळले. त्यामुळे सर्व पंच चिडले. यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी शिवराजला बाहेर नेले. 'मी पराभूत झालेलो नाही. माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते. त्यामुळे कुस्ती चितपट झालेली नाही. 'व्हिडिओ' बघून 'रिव्ह्यू' घ्या. माझे म्हणणे ऐकले जात नाही,'' असा आरोप शिवराज राक्षेने केला. तर, शिवराजने पंचांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यावर बंदी घाला असे मागणी पंच करीत होते. शिवराज पुन्हा मैदानात येत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी त्याला बाहेर नेले.

तर दुसरीकडे किताबी लढतीत पृथ्वीराजने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. शेवटच्या गुणाबद्दल त्याच्या प्रशिक्षकांचा आक्षेप होता. तो मैदानात आल्यावर पोलिसांनी त्याला बाहेर काढले. त्यावेळी कुस्ती संपण्यासाठी केवळ सोळा सेकंद उरले होते. महेंद्रचे प्रशिक्षक त्याला कुस्ती खेळू नको म्हणत होते. त्याने 'वॉकआऊट' केले. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले. थोड्या वेळाने महेंद्रही पंचांच्या दिशेने धावला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याला अडवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आयोजकांनी समयसूचकता दाखवून लगेच राष्ट्रगीत सुरू केल्याने परिस्थिती निवळली.

माहिती स्रोत - दै. सकाळ.