| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ डिसेंबर २०२४
जैन तीर्थंकरांची सर्वाधिक जन्मभूमी व तीर्थक्षेत्रे असलेल्या बिहार राज्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणे जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, क्षेत्र गिरनारवर होत असलेल्या अवैध अतिक्रमणासबंधी आपल्याकडून केंद्र सरकारला पत्र लिहावे. अशी परिस्थिती पुन्हा होवू नये यासाठी बिहारमधील सर्व तीर्थस्थळांचे संरक्षण आणि विकास व्हावा. त्यासाठी पुरातत्व विभागातर्फे जैन तीर्थक्षेत्राचे सर्वेक्षण आणि जैन प्रतिनिधींना सदस्यता मिळावी. तसेच दिगंबर जैन साधू -साध्विना विहारादरम्यान सुरक्षा मिळावी अशाप्रकारचे निवेदन दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बिहारचे राज्यपाल मा. श्री. राजेंद्र आरळेकर यांना दिले. श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या कार्याची ओळख करून देवून माननीय राज्यपाल महोदय यांचा सभेच्यावतीने पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.
सध्या देशात अनेक मंदिरांची तोडफोड व ताबा घेण्याचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये जैन मंदिरांचाही समावेश आहे. गुजरात मधील सौराष्ट्र भागातील गिरनार पर्वतावर असलेल्या नेमिनाथ तीर्थंकर यांचे टोक एका समुदायाने गिळंकृत केले असून, याबाबत शासकीय व कायदेशीर मार्गाने, हे तीर्थक्षेत्र जैन समुदायाला परत मिळावे असा प्रयत्न सुरू आहे.
संपूर्ण देशभरात जैन समाजाची अनेक पुरातन मंदिरे आहेत. या सर्व जैन मंदिरांची सुरक्षा हा चर्चेचा आणि सुरक्षितेचा गंभीर विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण भारत जैन सगळे मार्फत श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी बिहारचे राज्यपाल मा. राजेंद्र आरळे यांना दिलेल्या या निवेदनाचे महत्त्व अत्याधिक आहे.
राज्यपाल यांनी या निवेदनावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकारी यांनी बिहारला येण्याचे निमंत्रण देवून आपल्या निवेदनावर निश्चितपणे विचार करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर, ॲड. जयंत नवले, शितल पाटील, आदि उपस्थित होते.