Sangli Samachar

The Janshakti News

मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय ठरणाऱ्या तिसऱ्या मुंबईस मिळाले खास नाव !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ ऑक्टोबर २०२४
मुंबई शहरावर येणारा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई शहर विकसीत करण्यात आले. आता दोन्ही या शहरातील पायाभूत सुविधा आणि येथील दळणवळणाच्या सुविधांवर वाढणारा ताण पाहता महाराष्ट्र राज्य शासनानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देण्यासाठी तिसरी मुंबई विकसीत केली जात आहे. नवी मुंबई विमानतळानजीकच्या परिसरात एक नवं शहर उभारलं जात आहे. 'थर्ड मुंबई' अर्थात 'तिसरी मुंबई' (Third Mumbai) म्हणून विकसीत केले जाणारे हे शहर तिसरी मुंबई नावाने ओळखले जाणार नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने या तिसऱ्या मुंबईला खास नाव ठेवले आहे. या नावानेच ही तिसरी मुंबई ओळखली जाणार आहे. 


तिसरी मुंबई कुठे आहे ?

मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणच्या (एमएमआरडीए) माध्यमातून तिसरी मुंबई अर्थात हे नवे शहर निर्माण केले जाणार आहे. ही तिसरी मुंबई जवळपास 323 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विकसीत केली जाणार आहे. या तिसऱ्या मुंबईमध्ये उलवे, पेण, पनवेल, उरण, कर्जत आणि आजुबाजूच्या परिसरातील 100 हून अधिक गावांचा समावेश असेल. यामध्ये 'नैना' प्रकल्पातील गावांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एखाद्या विकसित शहरात ज्या सोईसुविधा नागरिकांना मिळतात. त्या सर्व सुविधा या नव्यानं उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईमध्ये मिळणार आहेत. या शहराला कनेक्टीव्हीटीच्या उत्तम सुविधा मिळणार आहेत.

तिसरी मुंबई कोणत्या नावाने ओळखली जाणार?

एमएमआरडीएने या तिसऱ्या मुंबईला खास नाव ठेवले आहे. कर्नाळा-साई-चिरनेर न्यू टाऊन अर्थात KSC न्यू टाऊन (Karnala-Sai-Chirner New Town- KSC New Town) असे नाव ठेवण्यात आले आहे. या नावानेच ही तिसरी मुंबई ओळखली जाणार आहे. 324 चौरस किमी क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या KSC न्यू टाऊन मध्ये 124 गावांचा समावेश आहे. ज्यामध्ये नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) अंतर्गत 80, खोपटा न्यू टाउन अधिसूचित क्षेत्र अंतर्गत 33, मुंबई महानगर प्रादेशिक योजनेअंतर्गत 2 आणि रायगड प्रादेशिक योजनेअंतर्गत 9 गावांचा समावेश आहे.कर्नाळा पक्षी अभयारण्य तसेच चिरनेर येथील JNPT बंदर हे तिसऱ्या मुंबईच्या क्षेत्रात येत आहेत. यामुळे या दोन महत्वाच्या ठिकाणांच्या नावानेच तिसऱ्या मुंबईला कर्नाळा-साई-चिरनेर न्यू टाऊन असे नाव देण्यात आले आहे.