Sangli Samachar

The Janshakti News

"त्यांना माझी दाढी खुपतेय... पण होती दाढी म्हणून..." मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्यासह महाआघाडीवर टीकास्त्र !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ ऑक्टोबर २०२४
सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून पुसून नव्हे तर ठासून आम्ही दोन वर्षे पूर्ण केली आहेत. माझी दाढी त्यांना खुपते पण, 'होती ही दाढी, म्हणून उध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी' असे आपल्या खास शैलीत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह, महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली. हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गटाचा) दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला, यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे रुपी हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला आली, अशी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता करून, एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार पंधरा दिवसही टिकणार नाही अशी टीका सुरुवातीस करण्यात आली. त्यानंतर हे सरकार सहा महिन्यात पडेल असे ते म्हणत होते. पण टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरून उरला. घासून फसून नाही तर आम्ही ठासून दोन वर्षे पूर्ण केली आहेत. मी बाळासाहेबांचा चेला आणि आनंद दिघे यांचा शिष्य आहे. मी मैदानातून पळून जाणारा नाही, तर विरोधकाला पळवून लावणारा आहे, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात हे सरकार जनतेचे लाडकं सरकार झालं आहे. लाडक्या बहिणीचे, भावांचे, शेतकऱ्यांचे हे लोकप्रिय सरकार आहे. असे सांगून ते पुढे म्हणाले की अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेबांची शिकवण होती. आणि म्हणूनच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला गेला नसता तर सच्चा शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


आपलं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र नंबर वन वर आणलं. बाळासाहेबांच्या विचारांशी मी कधीही प्रकरणा केली नाही, हिंदुत्व सोडले नाही. असंही यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार टीका केली. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा राज्य कारभार अतिशय सुयोग्य नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. पण हा विकास आघाडी कडून आमच्या सरकार बाबत केवळ गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. लाडक्या बहिणीकडून मिळणारा प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे, त्यामुळेच त्यांच्याकडून अशी फेक नरेटिव्ह वापरण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.