Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील भटकी जनावरे पकडण्याची मोहिम तीव्र, आठवीतील मुलाचे पत्र ठरले कारणीभूत !




| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ ऑक्टोबर २०२४
सांगलीतील भटकी जनावरे विशेषतः भटकी कुत्री हा शहरातील नागरिकांचा संतापाचा विषय. शहरात मुख्य रस्त्यावरून मोकाट फिरत असलेल्या भटक्या जनावरांचा वाहनधारकांना त्रास होत असतो. तर भटकी कुत्री ही अजाण, निष्पाप चिमुकल्यांच्या जीवावर उठल्याचे अनेक प्रसंग सांगली शहरात घडले आहेत. त्यामुळे या भटक्या जनावरांना व कुत्र्यांना पकडण्याची मागणी नेहमीच होत असते. केवळ जुजबी कारवाई करून महापालिकेचा संबंधित यापासून पळण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र आता आठवीतील एका मुलाच्या पत्राने या मोहिमेला गती आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुलमोहर कॉलनीत वास्तव्यास असलेल्या कुमार स्तवन वाघिला या आठवीतील मुलाने, भटक्या कुत्र्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे एका पत्राद्वारे तक्रार दाखल केली. यामध्ये त्याने परिसरातील भटक्या कुत्र्याचा होणारा त्रास कथन केला होता. परिणामी जिल्हाधिकारी व आयुक्त या दोघांनीही वाघिला याच्या पत्राची दखल घेऊन संबंधित विभागाला भटक्या जनावरांना पकडण्याचे आदेश दिले. 

दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची मिळालेल्या तंबाखूचे स्वच्छता निरीक्षक आणि सहा. आयुक्त यांच्या स्तरावर ही कारवाई करण्यात येत असून, भटक्या जनावरांना कोण वड्या टाकले जात आहेत तर त्यांच्या मालकावर गुन्हे दाखल करण्याची ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांनाही पकडण्याची मोहीम तीव्र केली आहे.

दरम्यान महापालिकेकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या स्तरावर अनेक उपाय योजना सध्या कार्यरत असून, भटक्या कुत्र्यांचे निर्भीजीकरण करण्याबरोबरच, त्यांना शहराच्या बाहेर निवारा शेड उभे करून तेथे त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना व संस्थांना, या भटक्या कुत्र्यांबाबत व जनावरांबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान नागरिकांनी भटक्या कुत्र्या बाबत अथवा जनावराबाबत डॉ. रविंद्र ताटे यांच्या 7030000235 या मोबाईल क्रमांकावर तक्रार दिल्यास अथवा सूचना केल्यास त्यानुसार सत्वर कारवाई करण्यात येईल असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.