Sangli Samachar

The Janshakti News

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला पाठिंबा देत, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची आ. सुधीरदादा गाडगीळ यांची ग्वाही !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ सप्टेंबर २०२४
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे तातडीने स्थापन व्हावे या मागणीस माझा पूर्ण पाठिंबा देत, आपण मुख्यमंत्री व विधी व न्याय खात्याचे कार्यभार सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

ॲड. भाऊसाहेब पवार यांनी कोल्हापूरमध्ये तातडीने खंडपीठ होण्याची गरज प्रतिपादन करून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील पक्षकारांच्या दृष्टीने हे खंडपीठ अत्यंत सोयीचे ठरणार आहे. या खंडपीठासाठी जागा उपलब्ध आहे, आवश्यकता आहे ती इमारत आणि आवश्यक कर्मचारी वर्ग यासाठी शासनाची मंजुरी मिळण्याची. हा विषय शासनाच्या समोर प्रलंबित आहे. गेले अनेक वर्षे सर्वच मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासनाशिवाय काहीही दिलेले नाही त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतीत लक्ष घालून गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण करावी, असे ॲड. भाऊसाहेब पवार व ॲड. किरण राजपूत यांनी आ. सुधीरदादा गाडगे यांना सांगितले.


मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे, अशी मागणी बरीच वर्षे वकिलांकडून केली जात आहे. या मागणी संदर्भात सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. या संदर्भातच सांगली वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड. भाऊसाहेब पवार व ॲड. किरण राजपूत यांनी आमदार गाडगीळ यांची नुकतीच भेट घेतली, त्यावेळी आ. गाडगीळ म्हणाले की, कोल्हापूर येथे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर येथील खंडपीठाच्या मागणीस पाठिंबा देणारे लेखी पत्रही ॲड. पवार व ॲड. राजपूत यांना दिले.