Sangli Samachar

The Janshakti News

कर्मवीर पतसंस्थेचे सामान्य माणसाला उभे करण्याचे कार्य कौतुकास्पद : पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ सप्टेंबर २०२४
समाजातील चांगल्या मंडळींची पुरस्कारासाठी निवड करुन त्यांचे काम सर्वांच्या पुढे आणण्याच काम कौतुकास्पद कार्य कर्मवीर पतसंस्था करीत आहे. असे भावोद्गार जेष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि 'भारतीय अणुउर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी काढले. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित कर्मवीर भूषण वितरण सोहळा त्यांच्या अमृतहस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपति प्रा. डॉ. शिवाजीराव कदम होते.

कर्मवीर आण्णांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कामाला जगाच्या इतिहासात जोड नाही. ते विचार घेऊन कर्मवीर पतसंस्था समाजातील सामान्य माणसाला आर्थिक उभारी देण्यासाठी चांगले कार्य करीत आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. त्या तरुण पिढीला देशाच्या विकासामध्ये वाव मिळाला पाहिजे. या तरुणामध्ये फार मोठी प्रतिभा आहे. अनेक देशात ते भारताचे नाव उज्ज्वल करीत आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक माणसाचं लहान मोठ योगदान आहे. पण देशातील प्रत्येक माणसाच जीवनमान उंचावल पाहिजे. त्यासाठी देशाला मोठा पल्ला गाठला पाहिजे. तो गाठता येईल याची मला खात्री आहे. पण देशातील विषमता नष्ट केली पाहिजे.


देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी आपण टेक्नोलॉजीचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. टेक्नोलॉजीची कॉपी न करता टेक्नोलॉजी विकसीत केली पाहिजे. यातून आपण एक प्रबळ देश म्हणून जगाच्या नकाशावर पुढे येऊ असा विचार जेष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

शेतात घरी बसून आपला तरुण उत्पादन करुन शकेल व व्यवसाय मिळवू शकेल. वर्क फ्रॉम होत असेल तर वर्क फ्रॉम व्हिलेजसुद्धा होऊ शकते. आपल्या तरुणांनी शहराकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्याकडे खूप संशाधने असल्यामुळे शहरातील माणसे खेड्‌याकडे येतील त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. यामध्ये कर्मवीर पतसंस्था मोठे योगदान देऊ शकते असा विश्वास त्यांनी या पुरस्कार वितरण सोहळयात व्यक्त केला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन व कर्मवीर आण्णांच्या प्रतिमा पुजनाने झाली. स्वागत व प्रास्ताविक कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले. त्यांनी संस्थेच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या मान्यवरांचे संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषीभूषण, प्रा. डॉ. डी. डी. चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण व उद्योजक श्री. योगेश लक्ष्मण राजहंस यांना कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार देवून सन्माणित करण्यात आले. पुरस्कार रुपाने रु.५१०००/- चा धनादेश, सन्मानचिन्ह, शॉल श्रीफळ प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित डॉ. अजित पाटणकर व पूर्व पुरस्कार प्राप्त श्री. मनोहर सारडा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने मूकबधीर मुलांच्या शाळेस रु.१ लाखाच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांनी संस्थेला धन्यवाद दिले व या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. तसेच या परिसरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही कार्यक्रमास मोठी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांच्या स्टॉलला डॉ. काकोडकरांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

यावेळी कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. ओ. के. चौगुले (नाना) कार्यवाह श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे. संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे, संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले. डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका भारती आप्पासाहेब चोपडे, सौ. चंदन नरेंद्र केटकाळे, संचालक श्री. आप्पासाहेब गवळी, श्री. बजरंग माळी, श्री. अमोल रोकडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदुम उपस्थित होते. आभार संचालक ॲड. एस.पी. मगदूम यांनी मानले.