Sangli Samachar

The Janshakti News

महापूर समितीच्या वतीने टिळक चौक येथे मानवी साखळी तसेच महापुरावर चर्चासत्र !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑगस्ट २०२४
महापुरा बाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची चूक झाली आहे. याबाबत सखोल चौकशी होऊन नागरिकांना न्याय मिळावा या मागणीसाठी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या वतीने महापूर समितीच्या वतीने टिळक चौक येथे मानवी साखळी तसेच महापुरावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी महापूराची एकंदर वाटचाल व मिळालेला प्रतिसाद याबाबत लोकांच्या होणारी जागृती संवेदनशील विषय असताना प्रशासनामधील उदासीनता खदखदत होती. 

समितीने 122 पत्रव्यवहार प्रशासनाला करूनही प्रशासनाने कोणतेच उत्तर आजतागायत समितीला दिले गेले नाही. नाशिक येथे "मेरी" ही महाराष्ट्र शासनाची हैड्रोलॉजीकल विषयांकित अभ्यास करणारी संस्था असताना रूरकी आयटी ला बॅक वॉटर अभ्यासासाठी काम देण्यात आले. सांगली, कोल्हापूर महापुराची वेळ प्रशासकीय अडमुठ्या धोरणामुळे महापुरासारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी या संवादात केली. 


शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनी हातातोंडाला आलेली पिके पाण्याखाली गेली. आमचं शासन मायनरकर दहापट वाढवून त्याची वसुली करते, हे कुठेतरी बंद होणे गरजेचे आहे. आणि कोणत्याही शेतकऱ्यांनी तो देऊ नये.

विजयकुमार दिवाण म्हणाले, दिलेल्या पत्रांचा जरी अभ्यास केला असता, तरी हा महापूर आला नसता. पण यावर कामकाज होताना दिसत नाही. अधिकारी पातळीवर उदासीनता असून दरवर्षी आपल्याला महापुराचे संकट येण्यापेक्षा कायमस्वरूपी हे संकट दूर व्हावे, म्हणून पुढील काळात कायदेशीर प्रयत्न करू. 

यावेळी बोलताना पाटबंधारे उप अभियंता गळतगे म्हणाले की, प्रशासना पर्यंत समितीच्या उपाय योजना पोहचवण्याचे काम करू, समितीला सहकार्य करू, असे आश्वासन दिले.

या वेळी प्रा.संतोष चिवटे, पुरातील नागरिकांची परिस्थिती कशी असते यावर प्रकाश टाकला. होणारी नुकसान भरपाई तोकडी आहे, अशा परिस्थितीमधून नागरिक वाटचाल करत असतात. 

प्रताप जामदार म्हणाले पुराच्या काळात प्रशासनाला आम्ही नेहमी सहकार्य करतो, परंतु प्रशासन आमच्याशी चांगली वागणूक देत नाही.

व्यापारी प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांनी महापुराची समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी समितीच्या प्रयत्नांना आमचा नेहमी पाठिंबा राहील असे सांगितले.

राकेश माळी कवठेपिरान म्हणाले, समितीने काढलेले निष्कर्ष आणि अलमट्टीचा होणारा त्रास अतिशय योग्य आहे. कायदेशीर पाठपुरावा समितीने करावा आम्ही त्यास पूर्णपणे सहकार्य करू. 

नीताताई केळकर म्हणाल्या की, समितीचे कार्य जवळून पाहिले आहे. त्यांचे मुद्दे प्रशासनापर्यंत पोहोचावेत यासाठी नेहमी प्रयत्न करू.

पृथ्वीराज (बाबा) पाटील प्रशासनाने गंभीरपणे या विषयावर लक्ष देऊन त्याचा पाठपुरावा करावा, ठोस मुद्दे यांचा सुद्धा विचार व्हावा, सातत्याने समितीने केलेला पाठपुरावा अतिशय उपयुक्त असून त्यातून प्रशासनाने बोध घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, प्रमोद माने, सुयोग हावळ, प्रसाद चोपडे, सचिन गवळी, दिनकर पवार तसेच ग्रामीण भागातील समिती प्रतिनिधी सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.