Sangli Samachar

The Janshakti News

‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा, सांगली येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे, मात्र सध्या ‘लव्ह जिहाद’च्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत आणि त्यांच्या निर्घृण हत्या सुरूच आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आधी ‘बहिणींना सुरक्षा द्या!’ बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करावा, अशी आग्रही मागणी 3 ऑगस्ट या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने मारुति चौक येथे आयोजित ‘हिंदु- राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली. 

उरण येथील कु. यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमा फासणारी हत्या करण्यात आली. कु. यशश्रीची हत्या करणार्‍या नराधम आरोपीला तात्काळ भरचौकात फाशी देण्यात यावी, ही मागणीही या वेळी करण्यात आली. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. महाराष्ट्रातून वर्ष 2019 ते 2021 या 3 वर्षांच्या कालावधीत 1 लाख युवती महाराष्ट्रातून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता आहेत, यामागे काही षड्यंत्र तर नाही ना !, ‘लव्ह जिहाद’चा प्रकार तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमायला हवे, अशी मागणीही या आंदोलनात मागणी करण्यात आली.


या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उमाकांत कार्वेकर, मिरज उपतालुकाप्रमुख श्री. विनायक ऐडके, सांगली शहरउपप्रमुख श्री. कुमार राठोड, भाजपचे श्री. अविनाश मोहिते, उद्योजक श्री. दिगंबर कोरे, हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी भाजप माजी नगरसेविका अधिवक्ता (सौ.) स्वाती शिंदे, श्री. पृथ्वीराज पवार, सर्वश्री रोहित पाटील, सागर गलांडे, शुभम होसमठ, सुरेश ठेंगले, अभिजित कोडग, महेश चव्हाण, अमित कुटे, शुभम खोत, संदीप जाधव, सूरज मगदूम उपस्थित होते.  

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई म्हणाले, ‘‘उरण-पनवेल मार्गावरील एन्.आय. हायस्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, देशभर संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे ‘श्रद्धा वालकर प्रकरणा’ची आठवण संपूर्ण देशाला झाली आहे. नवी मुंबईतील विवाहितेच्या शीळ डायघर परिसरातील खून प्रकरणाची घटना ताजी असतांनाच आता उरणमधील ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि हिंदू युवतींमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. ही केवळ पहिली घटना नसून ‘श्रद्धा वालकर, रुपाली चंदनशिवे, सोनम शुक्ला’ या अनेक हिंदू मुलींना लक्ष करण्यात आलेले आहे.

राज्यात दिवसेंदिवस महिला-मुलींवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर ‘अँटी रोमिया स्कॉड’सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांच्या प्रेमप्रकरणांच्या तक्रारी ‘लव्ह जिहाद’ म्हणून नोंदवल्या जाव्यात, तसेच या प्रकरणांत काही धर्मांध आणि कट्टरतावादी जिहादी संघटना, जिहादी नेते, परकीय शक्ती आढळून आल्यास त्यांची पाळेमुळे खणून काढावीत. त्यांच्यावरही तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्याही या आंदोलनात करण्यात आल्या.