Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडीची दिशा ठरणार 20 ऑगस्टला !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ऑक्टोंबर महिन्यात होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने महायुती आणि महाआघाडीची रणनीती आखण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने जी मुसंडी मारली आहे ती पाहता, विधानसभा निवडणुकीतही भाकरी पलटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः विधानसभेतही काँग्रेस पक्षच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप आणि मुख्यमंत्री कोण ? याबाबतची चर्चा करण्यासाठी 20 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नईथला यांनी ही माहिती पत्रकारांना दिली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही या बैठकीला उपस्थित असतील.


एका बाजूला महायुतीत अद्यापही सामसूम दिसत असताना, महाविकास आघाडीने जागावाटप आणि मुख्यमंत्र्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय याबाबत पहिले पाऊल पुढे टाकले आहे. महाराष्ट्रात सध्या महायुतीच्या विरोधात वातावरण असून याचा फायदा महाआघाडीला होऊ शकतो. त्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती टाळून एकसंघपणे महाआघाडीत विधानसभा निवडणुकीला सामंजस्याने सामोरे जाण्याची मानसिकता दिसून येत आहे. 

महाविकास आघाडीने ज्याप्रमाणे लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्र लढू आणि चांगले यश मिळवू असा विश्वास चेन्निथला यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान महाविकास आघाडीला मिळणारे संभाव्य यश पाहता, सर्वच विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पहावयास दिसून येत आहे. मध्यंतरी ज्या ठिकाणी भाजपा उमेदवार देईल, त्या ठिकाणी उभा ठाक आपला उमेदवार उभा करेल अशी चर्चा ठाकरे गटात रंगली होते, तर दुसरीकडे ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद अधिक तेथे महाविकास आघाडी सामंजस्याने आपला उमेदवार उभा करेल अशीही चर्चा होती. त्यामुळे आता या सर्वातून महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते काय आणि कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.