Sangli Samachar

The Janshakti News

पावसाळी पर्यटनासाठी जाताय ? मग ही बातमी नक्की वाचा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ जुलै २०२४
पावसाळा सुरू झाला की उत्साही तरुणांना ट्रेकिंग साठी जाण्याचे खूमखमी येते. इतकच नाही तर तेथे जाऊन जीवावर भेटणारी सेल्फी काढण्याचा मोहही होतो. अशातून अनेकांचे जीव गेले आहेत हे माहिती असूनही तरुणाई यापासून स्वतःला रोखू शकत नाही आणि म्हणूनच आता शासनाच्या वन विभागाने कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटनास जाण्यापूर्वी खालील बातमी नक्की वाचा. अन्यथा तेथे गेल्यानंतर तुमचा हिरमोड होऊ शकतो.

किल्ले सिंहगड, ताम्हिणी घाट, भीमाशंकर अभयारण्य आदी ठिकाणांवर पर्यटनास बंदी केली आहे. मागील रविवारी एका पर्यटकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. तोरणा किल्ल्यावरील एका पर्यटकाने जीव गमवला. लोणावळ्यात पाच पर्यटक वाहून गेले. यामुळे ३१ जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहे.

या ठिकाणी बंदी

पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरण, सिंहगड, गडकिल्ले परिसर, आंबेगाव भिमाशंकर, डिंभे धरण परिसर, कोंडवळ धबधबा, माळशेज घाट, शिवनेरी, माणिकडोह, भाटघर धरण, चासकमान धरण, भोरगिरी घाट या ठिकाणी बंदी आदेश लागू असणार आहे.

कोल्हापुरात धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद

कोल्हापुरातील शाहूवाडी परिसरातील धबधबे आणि धरणाजवळ पर्यटनाला बंदी घातली आहे. शाहुवाडी तालुक्यातील सर्वच धबधबे आणि पर्यटन स्थळांवर कलम 144 लागू केले आहे. भुशी डॅम दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील बरकी, केर्ले ऊखलू धबधब्याकडे जाणारे मार्ग प्रशासनाने बंद केले आहे.

अजिंठ्यात रील आणि फोटोस बंदी

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील धबधब्याजवळ रील आणि फोटो काढण्यास बंदी घातली आहे. अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरात रिल करण्यास बंदी केली आहे. सप्तकुंड धबधबा परिसर हा सुरक्षेच्या कारणास्तव धोकादायक असल्याने फोटो काढण्यास बंदी केली आहे. सप्तकुंड धबधबा आणि लेणी परिसरात
जीवाची बाजी लावून फोटो, रील, व्हिडिओ बनवणाऱ्यांची वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतला.

ठाणे जिल्ह्यात बंदी आदेश

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज, दहिवली, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदी, कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट , गोरखगड, भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर, आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट आणि घाटातले धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. सीआरपीसी कलम १४४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३४ अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.