Sangli Samachar

The Janshakti News

प्लॅस्टिक पिशवी बंदी काळाची गरज !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ३ जुलै २०२४
प्लास्टिक पिशवी जगाच्या विनाशासाठी कारणीभूत ठरत असलेला एक घटक. आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. हा दिवस प्लास्टिकच्या प्रदूषणाबाबत शून्य-सहिष्णुतेचा दृष्टिकोन आणि प्लॅस्टिक कचऱ्याच्या पुनर्वापराचे आणि कंपोस्टिंगचे महत्त्व सांगण्यासाठी साजरा केला जातो.

प्लॅस्टिक पिशव्या हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक सोयीस्कर आणि मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा भाग आहे, परंतु त्या पर्यावरणीय प्रदूषणाचा एक प्रमुख कारण देखील बनू शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, प्लॅस्टिकचे विघटन होण्यास 500 वर्षे लागू शकतात, त्यामुळे ते माती आणि पाण्यात जमा होऊ होतात, ज्यामुळे पर्यावरण आणि सागरी जीवनाला हानी पोहोचते. ते ड्रेनेज सिस्टम देखील रोखू शकतात, पुनर्वापर प्रक्रिया व्यत्यय आणू शकतात आणि जलमार्ग दूषित करू शकतात.

प्लास्टिकचा शोध लागल्यापासून आज अखेर साडेआठशे कोटी टन प्लास्टिक कचरा पडून आहे. आज घडीला जगाची लोकसंख्या सातशे कोटी आहे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर साडेबाराशे किलो प्लास्टिक कचऱ्याचे ओझे आहे. साडेआठशे कोटी टन प्लास्टिक कचरा आहे तो समुद्रात पडून आहे. समुद्रामध्ये एक ग्रेट गार्बेज पॅच निर्माण झाला आहे. आणि हा पॅच इतका मोठा आहे की, यामधील प्लास्टिक उचलून आपल्या देशात ठेवायचे म्हटले तर, अर्धी सांगली नव्हे, अर्धा महाराष्ट्र नव्हे, तर अर्धा भारत तीळ फूट उंची बुडून जाईल. हे केवळ पॅसिफिक महासागराचे आहे. जगातील इतर महासागरांचा विचार केला तर ही समस्या किती मोठी आहे, याचा विचारही करवत नाही.


आपण माणसांनी एव्हरेस्ट शिखरापासून ते अंटारटीका पर्यंत जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात मिळून किमान ८५० कोटी टन प्लॅस्टिक कचरा तयार केला आहे.तो कचरा तिथे तसाच किमान ५०० वर्षं तरी राहणार आहे.आणि नुसता राहणार नाहीये तर तो आपली माती,अन्न आणि पाणी नासावणार आहे.

आज आपण एकतर तो रस्त्यावर किंवा उघड्यावर कुठेही फेकतो किंवा कचरापेटी मधून कचरा डेपो वर जातो ,९५% कचरा डेपो वर कोणतीही प्रक्रिया न होता ती जाळला जातो त्यामधून कॅन्सर होणारे गॅसेस हवेत रोज सोडले जातात.

आणि हे सगळं प्लॅस्टिक कचरा रिसायकल होऊ शकत असताना चालू आहे.तांत्रिक दृष्टया उपाय जरी उपलब्ध असला तर प्रत्येक गावातल्या प्रशासनाला व नागरिकांना याचे महत्व पटून सर्व प्लास्टिक रिसायकल कसे होईल ही खरी आपल्यासमोर माणूस म्हणून कसोटी आहे.
यासाठीच ही प्लॅस्टिक जागृती चळवळ.

हिमांशु लेले
पृथ्वी शून्य कचरा फौंडेशन.
निसर्ग संवाद

प्लॅस्टिक एकदा कचऱ्यात गेलं, म्हणजे आपण एखादे चॉकलेट खाऊन त्याचं रॅपर जमिनीवर टाकलं तर ते आठशे ते हजार वर्ष जास्त होत नाही. यामध्ये सर्वात घातक गोष्ट अशी की, जमिनीवर असो अथवा समुद्रात या प्लास्टिकचे मायक्रो प्लॅस्टिक मध्ये रूपांतर होत आहे. मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही. प्लॅस्टिकच्या एका पिशवीचे हजार तुकडे होतात. आणि हे तुकडे आपल्या अन्नात, आपल्या पाण्यात, आपल्या मातीत, हवेत मिसळते आहेत. आणि येथून ते आपल्या शरीरामध्ये मिसळत आहेत. सध्या आपण जे मीठ खातो त्या मिठातूनही त्यातून हे मायक्रो प्लॅस्टिक आपल्या शरीरात दिसत आहे. ही समस्या इतकी गंभीर आहे की, मातेच्या दुधातून ते नवजात बालकाच्या रक्तात मिसळत आहे.

प्लास्टिक ही एक अशी गोष्ट आहे, जी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आढळून येते. प्लास्टिक असो अथवा मायक्रो प्लास्टिक असो ते कुजत नाही. निसर्गाचे स्वतःची एक ताकद असते, विघटनशील कचरा स्वतःमध्ये सामावून घेते. तेव्हा त्याचे अन्य मार्गाने विघटन होते. म्हणजे आपण एखाद्या केळीची साल जमिनीवर टाकले तर त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, कुठले तरी जीव ते नष्ट करत असतात. परंतु प्लास्टिक हा असा कचरा आहे, तो स्वतःमध्ये सामावून घेण्याची ताकद निसर्गामध्ये नाही. जेव्हा या प्लास्टिकचे मायक्रो प्लास्टिक मध्ये रूपांतर होते, आणि मातीत मिसळलेले हे मायक्रो प्लास्टिक विविध पिकातून आपल्या शरीरात मिसळत आहे. आणि आपल्या शरीराला ठाऊक नाही त्याचं विघटन कसं करायचं. ज्यामुळे या प्लास्टिकचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाही.

या प्लास्टिकचा ग्लोबल वॉर्मिंगवरही होतो आहे. सांगली असो अथवा इतर कुठलेही शहर अथवा गाव. तेथे कचरा पेटवला जातो. आणि त्यामुळे जे प्रदूषण होते आहे. यामुळे ग्लोबल वार्मिंगला जो घटक कारणीभूत आहे, तो ग्रीन गॅस हा कचरा जाळल्यामुळे निर्माण होतो. इतकेच नव्हे तर कॅन्सर सारखे आजार ही यापासून होण्याचा धोका संशोधकांनी व्यक्त केला आहे.

सध्या प्लास्टिकला बायो प्लास्टिक हा पर्याय आपल्याकडे उपलब्ध होतो आहे. बायो प्लास्टिक म्हणजे मक्याच्या दाण्यापासून हे प्लॅस्टिक बनवलं जातं. किंवा वेगवेगळ्या भाज्यांच्या स्टार्च पासून हे बायो प्लास्टिक बनवलं जातं. अर्थात यामध्ये हे भेसळीचा धोका असल्याने ते कितपत सुरक्षित राहील याबाबत शंकाच आहे. तरीही दगडापेक्षा वीट मऊ या न्यायानुसार बायो प्लास्टिक सध्यातरी सुरक्षित मानले जाते. जे निसर्गात विघटन होऊ शकते. आणि सध्या बाजारात अशा बायो प्लास्टिक पासून बनवलेल्या पिशव्या विक्रीसआलेल्या आहेत. ज्याचा केवळ निसर्गालाच नव्हे तर आपल्या शरीरालाही कोणता धोका नाही. अर्थात यामध्ये आणखीन एक मुद्दा येतो तो म्हणजे बायो प्लास्टिक पासून आपल्याला लागणारे पिशव्या इत्यादी बनवायचं म्हटलं तर त्यासाठी लागणार रॉ मटेरियल अर्थात मका इत्यादी आपल्याला तितक्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल का ? आणि जर उपलब्ध होऊ शकणार नसेल तर ते पीक वाढवण्यासाठी काय करावे लागेल हा आपल्या यंत्रणेसमोरील मोठा प्रश्न आहे.

परंतु प्लास्टिकचा हा भस्मासुर नष्ट करायचा असेल तर प्रत्येकानेच आपली जबाबदारी समजून, हे प्लॅस्टिक कचऱ्यात न टाकता ते रिसायकलिंगसाठी पाठवण्याची आवश्यकता आहे.

प्लॅस्टिक कचरा पृथ्वीला पोखरतो त्यामुळे पृथ्वी आणि निसर्ग वाचविण्यासाठी प्लास्टीक प्रतिबंध गरजेचे आहे, या विचाराने सुरू झालेल्या पृथ्वी झिरो वेस्ट फौडेशन आणि निसर्ग संवादच्या प्लास्टीक जागृती चळवळ ला नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून तीन वर्षात तब्बल ५० टन प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने योग्य विल्हेवाट लावून रिसायकल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जनाची बचत झाली आहे.

महापालिका क्षेत्रात जळी-स्थळी प्लास्टीकचा खच होता. नागरिकही बेफिकीरपणे प्लास्टीकचा वापर करतात. ओल्या कचऱ्यातून प्लास्टीकचे डंपिंग होते आणि शेकडो
वर्षे प्लास्टीक नष्ट होत नाही. ओला कचरा कुजविण्याच्या प्रक्रियेतही अडथळा येतो. या सर्व गोष्टीचा विचार करुन प्लास्टीक मुक्तीसाठी हिमांशू लेले आणि पवन ठोंबरे हे दोघे तरुण एकवटले. तीन वर्षांपूर्वी पृथ्ची झिरो वेस्ट फौंडेशन आणि निसर्ग संवादच्या पुढाकाराने जीवन विद्या मिशन, इंडियन मेडीकल असोसिएशन, सांगली जिल्हा रोटरी परिवार, अक्षर मानव या संस्थांच्या सहकार्यातून हिमांशू व पवन यांच्यासह डॉ. माधवी पटवर्धन, संजय कट्टी, राजेंद्र जोशी, महेश कुलकर्णी, सायली दौडे, सायली देशपांडे यांनी प्रभावीपणे अभियान सुरू केले.

या अभियानाच्या सुरुवातीचा काळ जनजागृतीत गेला. प्रारंभीच्या काळात नागरिकांना प्लास्टीकचे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय यावर जनजागृती करण्यात आली. सदरचा कचरा संकलन करण्यासाठी सांगली मध्ये सात मिरजेत सात आणि विश्रामबागमध्ये १२ अशी २६ संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक महिन्यातील शेवटच्या रविवारी प्लास्टीक संकलन केले जाते. जुलै हा या अभियानातील प्लास्टीक संकलनाचा ३१ वा महिना
होता. या महिन्यात तब्बल एक हजार, दोनशे किलो वजनाचा प्लास्टीक कचरा संकलीत करण्यात आला आहे. तीन वर्षात ५० टनहून अधिक कचऱ्याचे संकलन करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबर रिसायकलिंगही करण्यात आले आहे.

संकलनापासून वर्गीकरणापर्यंत...

आपल्या घरातील प्लास्टीक कचरा ओल्या कचऱ्यातच नागरिक फेकून यायचे. मात्र, फौडेशनने केलेल्या आवाहनानुसार प्लास्टीक कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच केले जात आहे. प्रत्येक महिन्यातील शेवटच्या रविवारी फौडेशनची प्लास्टीक संकलन गाडी सर्व केंद्रांवर जाते. सर्व कचरा सुभाषनगर येथील पवन ठोंबरे यांच्या गोडावूनमध्ये एकत्रित केला जातो. तेथे आठ प्रकाराच्या प्लास्टीक कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते आणि त्यानंतर मालेगाव, पुणे, मुंबई व सांगली येथील रिसायकल युनिटला पाठविले जाते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून अभियानाचाच खर्च मागविला जातो. प्रक्रियेस खर्च जास्त असल्याने सामाजिक संस्था, संघटनांकडूनही मदत घेतली जाते.

प्लास्टिक कचरा निसर्गाला घातक

प्लास्टिक हे वापरायला अतिशय सोयीस्कर असले तरी त्याचा अतिवापर व अयोग्य विल्हेवाट निसर्गासाठी घातक आहे. प्लास्टीक हे पृथ्चीला पोखरत चालले आहे. एकदा टाकलेले प्लास्टिक साधारण एक हजार वर्षे कुजत नाही. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीच ही प्लॅस्टिक जागृती चळवळ आहे.

हिमांशू लेले
पृथ्वी झिरो वेस्ट फौंडेशन