Sangli Samachar

The Janshakti News

राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या जयंत पाटलांची योजना कौतुक करीत अजित पवारांनी राबविली राज्यभरात !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्रीपदी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात 'माझी शाळा आदर्श शाळा' व 'स्मार्ट पीएचसी' हे उपक्रम सुरू केले. हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरले असल्याने संपूर्ण राज्यात हे उपक्रम राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्या काळात त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आणले. त्यातील दोन महत्वाचे उपक्रम म्हणजे माझी शाळा आदर्श व स्मार्ट पीएचसी उपक्रम.

जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक व भौगोलिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शाळेत डिजिटल क्लास रूम, प्रशिक्षित शिक्षक, प्ले ग्राऊंड, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आदि गोष्टी समाविष्ट केल्या गेल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरक औषधांचा साठा, सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी योग्य कर्मचारी भरती अशा विविध गोष्टी केल्या गेल्या.


या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला. तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना एकत्रित करुन विशेष निधी उभारला. सद्यस्थितीला ५५० पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर सुरू आहे, तसेच ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पीएचसी उपक्रमाची सुरुवात झाली आहे. आता शासनातर्फे राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार असल्याने अख्या राज्यात जयंतराव पाटील पॅटर्न राबवला जाणार अशी चर्चा आहे.

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील 'सख्ख्य' साऱ्या राज्याला ठाऊक आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे तोंड भरून कौतुक करीत त्यांनी राबवलेल्या उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही जयंत पाटील यांच्यासाठी साखर पेरणी तरी नाही ना ? अशीही शंका उपस्थित केले जात आहे.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे आपली शक्ती उभी केली आहे. त्यांच्या कार्यशालीमुळे काही वेळा त्यांच्याबाबत वादंग उठला असला तरी राष्ट्रवादीला मिळालेले बळ दुर्लक्षित करून चालणार नाही. परंतु मध्यंतरीच्या काळात जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे बलस्थान असलेल्या जयंत पाटील यांना आपल्या गटात ओढण्यासाठी ही खेळी नाही ना ? असाही प्रश्न राजकीय क्षेत्रात केला जात आहे. अर्थात जयंत पाटील याला किती प्रतिसाद देतात, हे आगामी काळातच दिसून येईल.