Sangli Samachar

The Janshakti News

सांगली लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाची खेळी काँग्रेस व्याजासहित वसूल करणार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ जुलै २०२४
सांगली लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाने केलेली आगळीक आणि त्याला काँग्रेसने दिलेले अनोख्या पद्धतीचे उत्तर केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजले होते. परंतु काँग्रेसने नव्हे तर जिल्ह्यातील मतदारांनीच याला परस्पर प्रत्युत्तर दिले आणि विशाल पाटील लोकसभेत पोहोचले.

ठाकरे गटाचे ही कृती काँग्रेसच्या नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी झोपली आहे. आणि याचा वचपा आता विधान परिषदेच्या माध्यमातून काढण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे धामधूम सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ठाकरे गटाचा आग्रह डावलून प्रज्ञा राजीव सातव यांनाच विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी जाहीर केली आहे. यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील घटनांचेही कंगोरे आहेत.

हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती. नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम यांचा दारुण पराभव केला. त्याचवेळी त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या विषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तक्रार केली होती, पण काँग्रेसने खासदार आष्टीकर यांची सूचना मान्य केली नाही.

प्रज्ञा सावंत यांना डावल्यामुळे हिंगोलीमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या नाराजीचा फटका आगामी विधानसभेला बसू नये, यासाठी विधान परिषदेच्या माध्यमातून प्रज्ञा सावंत यांचे पुनर्वसन करून हिंगोलीतील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून काँग्रेस करीत आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात कुरघोडी करू नये म्हणून ठाकरे गटाला देण्यात येणारा हा संदेश असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.