Sangli Samachar

The Janshakti News

टी ट्वेंटी विश्वचषक विजेता भारतीय संघाला महाराष्ट्र शासनाकडून 11 कोटीचे पारितोषक !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जुलै २०२४
भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरु आहे हे आपल्या टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणत कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविजेता भारतीय संघावर कौतुकाची उधळण करीत काढले. तसेच भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 11 कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले. यावेळी त्यांनी मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि अत्याधुनिक असेच स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाला हरवलं, तेव्हाच आपण अर्धा विश्वचषक जिंकला. सूर्यकुमार यादवच्या अजरामर झेलमुळे आपण विश्वचषक जिंकला आणि देशभरात गेले आठवड्यावर जल्लोष सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. या विजयामुळे देशवासियांचा गौरव झाला आहे, या भावनेने सारे भारतीय संघाचे स्वागत करीत आहेत. याचसाठी काल विजेत्या संघाच्या स्वागतासाठी मुंबई अरबी समुद्राच्या शेजारी जनसागर कोसळला होता. आपल्या या संघाने भारतच क्रिकेटमध्ये विश्वगुरु आहे हे सिद्ध केले आहे. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. आपले वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. तर काल क्रिकेटचे वारकरी याच भावनेने मुंबईकडे आले होते. मुंबईत दिवाळी-दसऱाच साजरा झाला. भारतीय संघात मुंबईकर चार खेळाडू आहेत. कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार हे विजयाचे शिल्पकार आहेत, याचा सर्वांनाच अभिमान आहे. विशेष म्हणजे एकही सामना न हरता या संघाने विश्वचषक जिंकला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


भारतीय संघात मुंबईतील अनेक दिग्गज आणि महान क्रिकेटपटूंचा समावेश असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की 1983 चा विश्वचषक आपण कपिल देव यांनी घेतलेल्या त्या एका झेलमुळे जिंकलो होतो. कपिल देव यांचा तो झेल आणि सूर्यकुमार यादव यांचा या स्पर्धेतील झेल हा भारतीयसाठी अजरामर क्षण ठरला आहे. हे विश्व विजेतेपद प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. मुंबईकर खेळाडूंनी आपल्या नावाप्रमाणेच भारताची विजय पताका जगात फडकवली आहे. त्यानी यापुढेही भारतीयांना असाच विजयोत्सव साजरा करण्याची संधी मिळवून द्यावी. यासाठी मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आणाला आहे. एका अपराजित संघाने विश्वजीत जिंकला आहे. रोहित शर्मांनी अद्वितीय कामगिरी करत भारतीय क्रिकेटच्या दिगजांच्या मांदियाळीत स्थान पटकावले आहे. रोहित शर्मा यांनी कपिल देव, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर आपला नावलौकिक केला आहे. कर्णधार म्हणून रोहित यांनी संघातील सहकाऱ्यांचा जिंकलेला विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्यांचे नेतृत्व शैली ही भारतीय संघाच्या कर्णधाराची परंपरा राखणारी आहे. मुंबईतील हे सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहे असे सांग सांगून आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबईत एक लाखापेक्षा जास्त क्षमतेचे आधुनिक स्टेडियम बांधण्याची सूचना त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला केली. भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी केलेली गर्दी अभूतपूर्व होती मात्र मुंबईकरांनी शिस्त मोडली नाही. त्यामुळे त्यांनी मुंबईकरांचेही अभिनंदन केले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, विधान भवनात असा दिमाखदार समारंभ होतो आहे याचे मोठे समाधान आहे. चमत्कार घडेल असे वाटत होते आणि चमत्कार घडला. आपला क्रीडा रसिक आगळावेगळा आहे मरीन ड्राईव्हला अलोट गर्दी होती. भारतीय लोक क्रिकेटवर प्रेम करतात, असे प्रेम जगात कुठेही दिसत नाही. या स्पर्धेत अमेरिकेसारखा संघ होता. सूर्यकुमार यांचा झेल हा अप्रतिमच होता. यापुढे रोहित टी ट्वेंटी खेळणार नाही. पण यापुढे ज्या ज्या वेळी आपण टी-ट्वेंटी पाहू त्यावेळी रोहितची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाने प्रत्येकाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला आहे. क्रिकेटमुळे विधिमंडळ कामकाज करतानाही मदत होते, असे सांगत त्यांनी विधिमंडळातर्फे खेळाडूंना शुभेच्छा देऊन आगामी काळात गौरवशाली क्षण घेऊन येण्याबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की विधान भवनात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम होत आहे. हा सोहळा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने होणारा सत्कार होता. खेळाडूंच्या विजयासाठी प्रत्येक नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. या अभूतपूर्व विजयानंतर क्रिकेटसह सर्वच क्षेत्रातील प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, असेही आवाहन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह खेळाडूंचे वैशिष्ट्यपूर्ण ट्रॉफी, विधिमंडळाचे स्मृतीचिन्ह, छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधिष्ट मूर्ती, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रीयन असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या सत्कार सोहळ्याने आपण सारेच आनंदित झालो आहोत. काल आणि आज झालेले स्वागत आम्ही कधीच विसरू शकणार नाही. मुंबई पोलीसांनी केलेले नियोजन अप्रतिम होते. विश्वकरंड जिंकणे हे आमचे स्वप्न होते. सर्व खेळाडूंनी बजावलेल्या सांघिक प्रयत्नामुळे हा करंडक जिंकता आला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले. विधान भवनाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदने कामाचे सूत्रसंचालन केले.

टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मासह त्याचे सहकारी सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे प्रशिक्षक पारस म्हात्रे, संघ व्यवस्थापक अतुल कानडे यांचा आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात विशेष सत्कार करण्यात आला. खचाखच भरलेले हे मध्यवर्ती सभागृह आज क्रिकेटच्या जल्लोषाने भारावून गेले .भारतीय राष्ट्रध्वज उंचावून सभागृहात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणाही घुमल्या. 'हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला' या क्रिकेटमधील विक्रमादित्य लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या आवाजातील गाण्याने आणि हिंदी चित्रपट चक दे इंडियाच्या जल्लोषी सुरांनी सभागृहात सुरुवातीपासूनच वातावरण दुमदुमून गेले होते. यातच टी 20 विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सहकार्यांचे आगमन होताच सभागृहातील घोषणा आणखी ती टिपेला पोहोचल्या. 

या विशेष समारंभासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार ॲड. आशिष शेलार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.