Sangli Samachar

The Janshakti News

अगोदर टोचले कान, मग धरला अबोला, आता तर दुरावा ?, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा भाजपाला संदेश काय ?


| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १७ जून २०२४
‘400 पार’चा नाऱ्याचा जयघोष करत भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरली. पण इंडिया आघाडीने त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फेरले. भाजपला 300 जागांचा टप्पा गाठता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅट्रिक साधली. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाले. त्यांनी शपथ घेतली आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वाग्बाणांनी भाजपला घायाळ केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अहंकार, मणिपूर, विरोधकांकडे बघण्याचा दृष्टिकोन यावरुन भाजपला कानपिचक्या दिल्या. उरली-सुरली कसर संघाचे मुखपत्र द ऑर्गनायझर आणि संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी भरुन काढली. अर्थात कुमार आता पलटले आहे. पण संघ आणि भाजपमधील हा उंदीर-मांजराचा खेळ रंगला. तसा तो जुनाच आहे. वाजपेयी आणि के.एस.सुदर्शन यांच्यात पण कुरबुरी होत्याच. पण आता मामाला जरा गंभीर आहे. आता दोन्ही संस्थांमध्ये दुरावा असल्याचे दिसत आहे.

भागवत यांनी भाजपला दाखवला आरसा

तर वादाला खास फोडणी घातली ती सरसंघचालक मोहन भागवत यांनी. लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना त्यांनी भाजपला चांगलेच भाले टोचले. जो मर्यादां पालनासह काम करतो, गर्व करतो पण अहंकार करत नाही, तोच खऱ्या अर्थाने सेवक म्हणून घेण्याच्या अधिकार मिळवतो. त्यांनी अनेक मुद्यांवर भाजपचे कान टोचले. त्यांनी मणिपूर हिंसेचा मुद्दा उचलला. त्यांनी राजसत्तेचे कर्तव्य काय याची आठवण करुन दिली. मणिपूरमधील हिंसा रोखणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे सांगितले. विरोधक हे जणू आपले शत्रूच आहेत, अशा पद्धतीने वागणे योग्य नसल्याचा टोलाही संघ प्रमुखांनी लगावला. विरोधक हा प्रतिपक्ष आहे. त्याच्या पण म्हणण्याला महत्व असते, असे फटकारे सरसंघचालकांनी लगावले. त्यानंतर आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायझरने भाजप नेतृत्वावर ताशेरे ओढले.


लोकसभा निवडणूक: धडे आणि यशही

संघाचे मुखपत्र द ऑर्गनायझरने निवडणूक निकालावर जोरदार टिप्पणी केली. फाजील आत्मविश्वासी नेते आणि कार्यकर्त्यांनी कसे नुकसान केले याचा आरसाच मुखपत्राने दाखविला. प्रत्येक जण प्रौढीत होता आणि लोकांचा आवाज त्यांच्या कानी पोहचलाच नाही, असे कान टोचण्यात आले. संघाचे मुखपत्र पांचजन्यमध्ये लोकसभा निवडणूक 2024 : धडे आणि यशही या शीर्षकाखाली खरमरीत लेख लिहिण्यात आला. त्यानंतर इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्याने तर भाजप आणि संघातील अंतर वाढल्याचे दिसून आले. ‘या लोकांनी भगवान रामाची भक्ती तर केली, पण हळूहळू त्यांच्यात अहंकार आला’ अशी टिप्पणी त्यांनी केली होती. आता त्यांनी भूमिकेपासून युटर्न घेतला असला तरी संघ आणि भाजपमध्ये सर्वच काही आलबेल नसल्याचे दिसून येते.