Sangli Samachar

The Janshakti News

'जातगणना झालीच पाहिजे...', भुजबळांच्या मागणीने शिंदे सरकार कोंडीत ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ जून २०२४
देशात जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच ही जनगणना झाली तर देशातील ओबीसींना मोठा फायदा होईल, केंद्रातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल, असे भुजबळ यांनी सांगितले आहे. भुजबळांच्या या मागणीने शिंदे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समता परिषदेची बैठक संपल्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. या बैठकीनंतर छगन भुजबळ म्हणाले की, समता परिषदेची बैठक नव्हती,दहा-बारा लोक भेटायला आली होती. त्याच्यासोबत लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा केली. यावेळी आम्ही विजय पराजयाची कारणे देखील शोधण्याचा प्रयत्न केला, असे भुजबळ यांनी सांगितले. आमच्या बैठकीत जातगणना करण्यात यावी यावर देखील चर्चा झाली. केंद्रात मोदी सरकार पुन्हा स्थापण झाले आहे. त्यामुळे जातगणना केली जावी, अशी मागणी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

छगन भुजबळ पुढे म्हणाले, जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी आपण केली पाहिजे. नितीश कुमारांनी देखील यासाठी आग्रह धरला आहे. एससी आणि एसटीला जसा केंद्रातून निधी मिळतो. तसा निधी ओबीसींना मिळत नाही. त्यामुळे हा निधी मिळावा यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली पाहिजे. तरच देशातील ओबीसींना मोठा फायदा होईल, असे भुजबळ यांनी सांगितले आहे. छगन भुजबळ यांनी यावेळी ओबीसी नेत्यांकडून सुरू करण्यात आलेल्या उपोषणावर देखील भाष्य केले. राज्यात काही लोक उपोषणाला बसले आहेत. आम्ही त्यांना माघार घेण्याची विनंती केली आहे. येत्या दोन दिवसात आम्ही वकिलांशी बोलणार आहोत. काही कागदपत्रे देखील आम्ही तयार केली आहे. आणि जर कुठे अन्यायपुर्वक गोष्टी घडत असतील, तर मी आंदोलनात उतरायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला.