Sangli Samachar

The Janshakti News

भाजपच्या अपयशाचं खापर संघाने अजित पवारांवर का फोडलं जातंय ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ जून २०२४
अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करुन घेतली… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आलेली ही कानउघडणी… , भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली.. अशा परखड शब्दात आरएसएसचे सदस्य रतन शारदा यांनी "मोदी ३.०: कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन" या ऑर्गनायझरच्या लेखात आपली भूमिका मांडली.. याचाच अर्थ भाजपची महाराष्ट्रात जी काही नाचक्की झाली ती अजितदादांना सोबत घेतल्यामुळेच झाल्याचं खापर संघानं अजितदादांवर फोडलंय… पण महाराष्ट्राच्या राजकारणातला अनुभवी, प्रशासनाची जाण, विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरही छाप सोडणारा..आणि ज्यांच्या नावाला राज्याच्या राजकारणात एक दरारा होता.. त्याच दादांना महायुतीत घेऊन गेम उलटा कसा पडला? दादा सोबत आल्यावर वजन वाढायचं सोडून भाजपची इमेज खराब झालीय, असं संघाला का वाटतंय? लोकसभेच्या निकालात भाजपची राज्यात जी काही नाचक्की झाली खरंच त्याला अजितदादांना जबाबदार धरता येईल का? तेच सविस्तर समजून घेऊया..
अजितदादांमुळे राज्यातून भाजप संपली असं म्हणायला पहिल कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे सत्तेसाठी विचारधारेंची दिलेली तिलांजली

महाविकास आघाडीतील शिंदेंना साईडला करुन भाजपने युतीचं सरकार बनवलं.. तेव्हा ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडला.. भाजपसोबत निवडणुक लढवून नंतर गद्दारी केली… ही सगळी कारणं पुढं करुन भाजपने आपण केलं ते कसं योग्य केलं हे महाराष्ट्राच्या जनतेला पटवून दिलं.. ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभुतीच्या फॅक्टरला बोथट केलं.. पण यानंतर सरकार बहुमतात असतानाही फडणवीसांनी राष्ट्रवादीतून फुटलेल्या अजित पवारांना सोबत घेतलं.. खरंतर हेच अजितदादा महाविकास आघाडी सत्तेत असताना निधीवाटपात अन्याय करायचे… हिंदुत्वाला विरोध करायचे… असा टीकेचा सूर भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी केला होता.. पण त्याच अजितदादांच्या मांडीला मांडी लावून फडणवीस सत्तेत बसले.. भाजप हा सगळा प्रकार सत्तेसाठी करत असून पक्षानं हिंदुत्वाच्या विचारांची केव्हाची तिलांजली दिली आहे, हे अजितदादांना सोबत घेतल्यावर जनतेचं परसेप्शन बनलं.. भाजपचे अनेक कार्यकर्तेही यामुळे भाजपवर नाराज झाले.. याचंच रिफ्लेक्शन लोकसभा निकालातही पाहायला मिळालं.. आणि भाजपला खासदारांचा दोन अंकी आकडाही गाठता आला नाही..


अजितदादांमुळे राज्यातून भाजप संपली असं म्हणायला दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे शरद पवारांना हलक्यात घेतल्याचं

पक्षातील मातब्बर सोबत आल्यानं अजितदादांचं विमान हवेत होतं.. पण राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचं कोणतंही ठोस कारण अजितदादांकडे नव्हतं.. त्यामुळे जनतेत शरद पवारांच्या बाजूने सहानुभुती तयार होऊन अजितदादांच्या विरोधात चीड निर्माण झाली.. हेच अचूक टायमिंग साधून पवारांनी दहा जागांवर आपले उमेदवार जाहीर केले.. एवढंच नाही तर यातल्या बहुतांश मतदारसंघात भाजपने पक्षफोडी राजकारण केल्याची लाईन ठळक केली.. त्यामुळे शिंदे आणि अजितदादांबद्धल असणारा राग आणि संताप भाजपकडेही शिफ्ट झाला.. शरद पवारांच्या तुतारीच्या विरोधात बहुतांश जागांवर भाजपचे उमेदवार होते.. तिथं अजितदादांच्या विरोधी आणि शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभुतीची लाट भाजपवर उलटली आणि तुतारीच्या विरोधातील भाजपचे ७ उमेदवार तोंडावर पडले.. शरद पवारांनी प्रचाराच्या काळात सहकारी पक्षांसाठी विदर्भ - मराठवाडा पिंजून काढला.. आपल्याला जनतेचा सपोर्ट मिळतोय हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादीफुटीची सहानुभुती कॉंग्रेस आणि ठाकरे गटालाही मिळवून दिली.. त्याचाच इम्पॅक्ट म्हणून भाजपचा नागपूर वगळता विदर्भातून पुरता सुपडासाफ झाला… पश्चिम महाराष्ट्रातीलही भाजपचा आकडा घसरला.. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीचा तोटा जितका अजितदादांना झाला नसेल त्यापेक्षा जास्त भाजपला बसला… अवघ्या ९ जागा जिंकल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा इन्फ्लुएन्स संपलाय, असा त्याचा अर्थ निघाला… थोडक्यात भाजपने अजितदादांना सोबत घेत शरद पवारांना हलक्यात घेतल्याची मोठी किंमत आता भाजपला राज्यात मोजावी लागतेय..

अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं स्वत:च राजकारण संपवलं असं म्हणायला शेवटचा मुद्दा सांगता येतो तो म्हणजे भाजपनं स्वत:हून वाढवलेला गुंता

शिंदे सोबत असताना भाजपचं सगळं सोर्टेड होतं. काहीही झालं तरी शिंदेंच्या शिवसेनेवर भाजपचा डॉमिनन्स होता.. त्यामुळे भाजप सांगेल ती पूर्व दिशा असा एकूणच सरकारचा आणि युतीचा कार्यक्रम चालला होता.. पण अजितदादा युतीत आले आणि या सगळ्यात मीठाचा खडा पडला.. कारण अजितदादांसोबत पक्षातील अनेक दिग्गज नेते आले होते.. त्यात हे नेते प्रस्थापित आणि सहकाराच्या जीवावर राजकारण करत असल्याने ते बिनधास्त होते.. त्यामुळे झालं असं की जेव्हा लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु झाली तेव्हा महायुतीत चांगलीच बिघाडी पाहायला मिळाली..राष्ट्रवादीचे स्थानिक नेेते, आमदार हाताबाहेर गेले आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतल्यानं अनेक ठिकाणी भाजपला फटका बसला.. थोडक्यात काय तर राष्ट्रवादीच्या फुटीचा बुमरँग भाजपवर होणं, विचारसरणीसाठी नाही तर सत्तेसाठी फोडाफोडी झाल्याचं परसेप्शन बिल्डअप होणं आणि अजितदादांना सोबत घेऊन जागावाटपाचा वाढवलेला गुंता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजप महाराष्ट्रात टोकापासून डायरेक्ट तळावर येऊन थांबलीय… अनेक गटतट आणि प्रेशर ग्रुप तयार झाल्याने भाजपसाठी विधानसभाही जड जाणार आहे, एवढं मात्र नक्की..