Sangli Samachar

The Janshakti News

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जयंतरावांनी विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांचं टेन्शन वाढवलं !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जून २०२४
सांगली लोकसभा निवडणूक यंदा राज्यात गाजली. भाजपचे संजयकाका पाटील यांचे खासदारकीची हॅट्रिक करण्याचे स्वप्न अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भंग केले. सांगलीच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विशाल पाटलांनी करुन दाखवलं.

सांगलीचे नेतृत्व आपण ठरवतो, असा समज करून घेणाऱ्या जयंत पाटलासमोर विशाल पाटलांनी (Vishal Patil) आगामी विधानसभा निवडणुकीत आव्हान उभे केले असल्याचे सध्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तीन ते चार जागा लढवणार असल्याचे जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातली कोणत्या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा सांगणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची धाकधूक वाढली आहे.


सांगलीतील एकूण आठ विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा सध्या शरद पवार गटाकडे आहे. या तीनही विधानसभासह आणखी एक जागा लढवणार असल्याचे सांगत जयंतरावांनी सांगलीत काँग्रेस नेत्यांची अर्थात खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांचे टेन्शन वाढवले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठ्या प्रमाणात जागा लढवेल,असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण आकडा सांगणार नाही, कारण पुन्हा त्यावर चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील,असा विश्वासच जयंत पाटलांनी व्यक्त केला. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.

सांगली लोकसभेच्या जागा वाटपामध्ये आपला काहीच संबंध नव्हता, मात्र आपल्याबाबत गैरसमज पसरला,असे जयंत पाटलांनी स्पष्ट केले. कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसने घेतल्याने शिवसेनेने सांगलीची काँग्रेसची जागा घेतली,असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.

'हातकणंगले लोकसभा मतदारसंघात थोडं दुर्लक्ष झालं.त्यामुळे फटका बसला,पण या मतदारसंघात धनशक्तीचा विजय झाला. मात्र जनशक्ती ही सत्यजित पाटलांच्या सोबतच आहे,असे देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील आजचे चित्र बदलून टाकण्यासाठी भ्रष्टाचाराला बाजूला करून महायुतीचे सरकार घालवूया,'असे आवाहन जयंत पाटलांनी केले.

विशाल पाटील यांचा विजय झाल्यानंतर सांगलीतून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत एका कार्यकर्त्यांने इस्लामपूर 42 किलोमीटर असा फलक रॅलीत नाचवला होता. हा फलक नेमका कोणासाठी होता याची चर्चा सध्या सांगली जिल्ह्यात जोरात सुरू आहे. सांगलीचा नेतृत्व ठरवणाऱ्या जयंत पाटलांना सांगलीपासून इस्लामपूर 42 किलोमीटर आहे, असे कार्यकर्त्यांनी दाखवून देत काय संकेत दिला वेगळे सांगायला नको.