Sangli Samachar

The Janshakti News

दुष्काळी भागात सरासरीच्या दुप्पट पाऊस



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जून २०२४
जिल्ह्यात कोकण म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिराळा तालुक्यात सरासरीच्या निम्मा तर अन्य तालुक्यात दीड ते दुप्पट पाउस यंदा मान्सून हंगामाच्या प्रारंभीच झाला आहे. दुष्काळी भाग ओळखल्या जात असलेल्या तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यातील येरळा, अग्रणी पहिल्याच पावसात दुथडी भरून वाहू लागल्या असून कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

दर हंगामात शिराळा तालुक्यात मान्सूनची जोमदार सुरूवात होते. पश्‍चिम घाटात मुसळधार ते अतिमुसळधार पाउस दरवर्षी जून, जुलै महिन्यात पडतो. यामुळे चांदोली, कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होते. यंदा मात्र, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव या भागात सरासरीच्या दुप्पट पाउस मान्सूनच्या पहिल्या चार दिवसातच झाला आहे.यामुळे ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत कोरडी असणारी अग्रणी नदी यंदा जूनमध्येच दुथडी भरून वाहत आहे. ओढे, नाले आणि येरळा यांचे पाणी कृष्णेला मिसळत असल्याने कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. म्हैसाळ येथील बंधारा पाण्याखाली गेला असून या बंधार्‍यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील कनवाड, हासूर या गावाचा संपर्क तुटला आहे.


गेल्या चार दिवसात तालुका निहाय झालेला सरासरी पाउस असा कंसात टक्के मिरज १६१.१ (१३७.२), जत १६८.१ (१८२.३), इस्लामपूर १५६.४ (११६.२), तासगाव १४७.४ (१२८.८), शिराळा ११२.८ (५७.२), आटपाडी १४४.४ (१८४.४), कवठेमहांकाळ १७९.६ (२०७.६), पलूस १०४.२ (१३४.५) आणि कडेगाव १४५.५ (१०९.९).गेले तीन दिवस संततधार पावसाने ओढे, नाले भरून वाहू लागले असून रानातील ताली तुडुंब भरल्या आहेत. यामुळे पेरणीसाठी उघडीप होण्याची प्रतिक्षा सध्या शेतकरी करत आहेत. खरीप पेरणीची तयारी झाली असली तरी रानात घात नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

पूर्व भागात संततधार पाउस पडत असताना पश्‍चिम घाटात मात्र पाउस अद्याप कमीच आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात नोंदला गेलेला पाउस असा कोयना ७१, नवजा ९५ मिलीमीटर. तर चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वारणावती येथे २२ मिलीमीटर पाउस झाल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.