Sangli Samachar

The Janshakti News

पंतप्रधानांचे चार 'अनमोल रत्न' ! मोदींची टीम लागली कामाला...



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १४ जून २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख खात्यांचा भार अत्यंत विश्वासू नेत्यांवरच पुन्हा सोपवला आहे. केवळ नेतेच नव्हे तर मोदींनी आपल्या अधिकाऱ्यांवरही पुन्हा भरवसा दाखवला आहे. त्यांच्या आधीच्या टीममधील चार 'अनमोल रत्न' म्हणून ओळख असलेल्या चौघांना पुन्हा नियुक्त केले आहे.

अजित डोवाल, पी. के. मिश्रा, अमित खरे आणि तरुण कपूर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर मागील टर्ममध्येही मोदींचा प्रचंड विश्वास होता. त्यामुळेच त्यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अजित डोवाल
अजित डोवाल हे नाव संपूर्ण जगाला परिचित आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी त्यांची सलग तिसऱ्या टर्ममध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. दशहतवादविरोधी ग्रीडची स्थापन करणे आणि देशाच्या गुप्तचर यंत्रणेला मजबूत करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील दोन्ही टर्ममध्ये डोवाल यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्वाची ऑपरेशन राबवण्यात आली. त्यामुळे मोदींनी पुन्हा तिसऱ्या टर्ममध्येही त्यांना आपल्या टीममध्ये घेतले आहे.


पी. के. मिश्रा
पंतप्रधान कार्यालयातील सर्वात अनुभवी अधिकारी म्हणून पी. के. मिश्रा यांचे नाव घेतले जाते. पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून पुन्हा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विविध मंत्रालयातील प्रशासनाला पुर्वीप्रमाणे अधिक गतिमान, गुणपत्तापूर्ण आणि पारदर्शक करण्याची मोठी जबाबदारी मिश्रा यांच्या खांद्यावर असणार आहे.

अमित खरे
अमित खरे यांची पुन्हा पंतप्रधान मोदींच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खरे हे झारखंड केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी होते. त्यांनी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये सचिव म्हणून काम केले आहे. पंतप्रधान कार्यालय आणि इतर मंत्रालयांमधील समन्वय चांगल्याप्रकारे करण्यात त्यांचा हातखंडा आहे. विकसित भारत, जन धन योजनांसह विविध महत्वाच्या योजना व प्रकल्पांवर खरे यांच्या विभागाची देखरेख असते.

तरुण कपूर
तरुण कपूर यांनाही पुन्हा मोदींनी आपल्या टीममध्ये सल्लागार म्हणून घेतले आहे. ते हिमाचल प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी अनेक मंत्रालयांमध्ये विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांत सुरू करण्यात आलेल्या योजना आणि पुढील काळात त्यांना वेगाने पुढे नेणे, नव्या योजना आणणे याची जबाबदारी या टीमवर असणार आहे.