Sangli Samachar

The Janshakti News

AC रेल्वेच्या डब्यातील धगधगते वास्तव !


सांगली समाचार वृत्त |
भोपाळ - दि. २९ जून २०२४
आयुष्यात पहिल्यांदा AC ने प्रवास केला. डब्यात सेवेसाठी नेमलेला पोरगा आला. त्याने पाणी आणून दिले. उशी आणून दिली. रेल्वेने AC डब्याच्या दिमतीला नेमलेला हा पोरगा मनापासून कामे करीत होता. डब्यात गर्दी नसल्याने जेवणवाला आला नाही. त्याने खाली उतरून खाद्यपदार्थ ही आणून दिले. त्याला खायला बोलावलं तरी येईना, बळेच बसवले. एकत्र खाताना सहज त्याची चौकशी केली. तेव्हा त्या थंड वातावरणात ही गरम लागले.

तो भोपाळचा. दर सोमवारी या रेल्वेसोबत येणार आणि आठवडा संपला की एक दिवसासाठी घरी जाणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी आठवड्यासाठी रेल्वेत पुन्हा दाखल. रेल्वे हेच त्याचे घर होते. इथपर्यंत ठीक होते पण पुढे त्याने जे सांगितले ते फारच वेदनादायक होते. मी त्याला विचारले की आठवडाभर या २४ तास duty चा पगार किती ? 

त्याचा चेहरा उदास झाला. तो म्हणाला “कोणता सांगू ?” मी विचारले “म्हणजे ?” . तो म्हणाला “कागदावर आमची २०,००० रुपयेवर सही घेतात आणि प्रत्यक्षात फक्त ५००० रुपये देतात “ प्रवासात असताना फक्त २०० रुपये रोज मिळतो. त्या २०० रुपयात दिवसाचा चहा, नाश्ता, आणि जेवण भागवायचे. काहीच परवडत नाही. पैसे वाचवायचे म्हणून घरून पोळ्या घेवून येतो. त्याच दोन दिवस खातो. आणि उरलेले दिवस वडा पाव खाऊन राहतो. मला त्याच्या नजरेला नजरच देता येईना.


तो वेदनेने म्हणाला “साहेब, अहो या रेल्वेत फक्त driver नोकरीत कायम आहे आणि सगळे सगळे आता तात्पुरते आहेत“ overtime मिळतो. पण ते आम्हाला नेमणारा आमचा मुकादम घेतो. त्यामुळे आम्हाला फक्त २०० रुपये रोजचा मिळतो. मी सुन्न झालो. तो म्हणाला भोपालमध्ये आम्ही असे २००० लोक आहोत. पण संघटना केली की ते कामावरून काढून टाकतात.    

मी उतरताना तो हसला. दिलेले पैसे घेत म्हणाला साहेब अजून सगळ्यात climax तर सांगायचाच राहिला. मी विचारले कोणता ? तो म्हणाला “ प्रवासी उतरताना चोरी करतात. जेव्हा प्रवासी छोटा टॉवेल घेवून जातात तेव्हा आमचे ५० रुपये , बेडशीट नेतात तेव्हा २०० रुपये आणि पांघरूण चोरी जाते तेव्हा १००० रुपये कापून घेतात. आठवड्यातून एक दोन घटना होत्तातच. डोळ्यासमोर दिसते. पण या शरीफ लोकांना बोलू शकत नाही. ते शिव्या देतात..... 

मी सुन्न झालो. त्याचा फोटो काढला म्हटले लिहितो तुझ्यावर. तो हात जोडून म्हणाला,  “नका टाकू माझा फोटो, मालकाने बघितले तर काढून टाकील“ मी म्हणालो “अरे मी मराठीत लिहीन तुझा मालच हिंदी वाचतो  तो म्हणाला “वो कुछ भी कर सकता है“ मालकाविषयीची ही तीव्र भीती असेल तर हा कधी संघर्ष करणार होता ? कंत्राटीकरणाचा भेसूर चेहरा त्याच्या चेहऱ्यात मी बघत होतो.. श्रीमन्त डब्यातील ही गरीब माणसे... कोणाच्याच खिजगणतीत नाहीत.


खाजगीकरण पाहिजे ना ? हे एकदा नक्की वाचा. असेच सगळ्याच ऑफिसचे आहे. हा काही बोटावर मोजण्याइतके कर्मचारी खूप शिकले असल्याने साहेब झाले. पण ते एकदम कमी प्रमाणात आहेत. पण करोडो शिकलेल्या विद्यार्थ्यांना खाजगीकरणाचा चांगलाच फटका बसला आहे व पुढे ही फटका बसणार आहे.