Sangli Samachar

The Janshakti News

भारतातील सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन्स, एका ट्रेनच्या मार्गात तब्बल 70 स्टेशन तर एक ट्रेन 13 राज्यातून करते प्रवास !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जून २०२४
भारतीय रेल्वेचं नेटवर्क देशभरात आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर स्वस्त आणि मस्त प्रवास भारतीय रेल्वेने करता येतो. इतकेच नाही तर भारतीय रेल्वेने प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. भारतात अनेक अशा ट्रेन्स आहेत ज्या लांब पल्ल्याच्या आहेत. ट्रेन्स या एका स्टेशनसोबत दुसऱ्या स्टेशनला कनेक्ट करतात आणि त्यामुळे आपला प्रवास सुखकर होतो. पण भारतातील सर्वात लांब मार्गाची ट्रेन कोणती आणि कोणती ट्रेन जास्त राज्यांतून प्रवास करते? हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात या संदर्भात अधिक माहिती...

विवेक एक्सप्रेस

विवेक एक्सप्रेस ही एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे जी संपूर्ण भारत भ्रमण करते. ही ट्रेन आसाममधील डिब्रूगढ येथून तामिळनाडू येथील कन्याकुमारीपर्यंत धावते. हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वात लांब पल्ल्याचा मार्ग आहे. हा पल्ला गाठण्यासाठी ट्रेनला 74 तास 35 मिनिटे इतका कालावधी लागतो. इतक्या काळात ट्रेन 4218.6 किलोमीटरचा प्रवास करते. ही ट्रेन 8 राज्यांतून प्रवास करते. ही ट्रेन स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधत सुरू केली होती.


अनोराई सुपरफास्ट एक्सप्रेस

अरोनाई एक्सप्रेस ही त्रिवेंद्रम सेंट्रल येथून सुरू होते आणि सिलचरपर्यंत धावते. हा प्रवास एकूण 3932 किलोमीटरचा आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अनोराई सुपरफास्ट एक्सप्रेसला 74 तास 44 मिनिटांचा काळ लागतो. ही ट्रेन एकूण 8 राज्यांतून प्रवास करते. सुरुवातीला ही ट्रेन त्रिवेंद्रम सेंट्रल येथून गुवाहाटी पर्यंत चालवली जात होती. पण नंतर ट्रेनचा सिलचरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

हिमसागर एक्सप्रेस

आठवड्यातून एक दिवस चालणारी ही एक स्पेशल ट्रेन आहे. कन्याकुमारी येथून श्री माता वैष्णोदेवी कटरा पर्यंत ही ट्रेन घेऊन जाते. 3787 किलोमीटरचा हा प्रवास हिमसागर एक्सप्रेस 72 तासांत पूर्ण करते. या दरम्यान ट्रेन 12 राज्यांतून प्रवास करते आणि या प्रवासात प्रवाशांना भारताची एक खास झलक पहायला मिळते. तसेच ही ट्रेन आपल्या प्रवासात एकूण 73 रेल्वे स्टेशन्सवर थांबते.

तिरुनेलवेली जंक्शन

एका आठवड्यात एकदा चालणारी ही ट्रेन आहे. ही ट्रेन जम्मू आणि काश्मीरच्या कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिर आणि तामिळनाडूतील तिरुनेलवेली जंक्शन यांना जोडते. लांब पल्ल्याची ही ट्रेन 3633 किलोमीटरचा प्रवास 69 तासांत पूर्ण करते. ही जगातील 40वी सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ही ट्रेन 13 राज्यांतून प्रवास करते आणि या दरम्यान एकूण 64 रेल्वे स्टेशनवर थांबते.