| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ मे २०२४
लोकसभा निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत केला आहे. पुढील दोन वर्षांत विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष त्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे, हे आमच्यासाठी अवघड असल्याचेही पवार म्हणाले. १९७७ मध्ये विविध पक्ष एकत्र आले होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले. विरोधकांनी तेव्हाही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. आता मोरारजी देसाईंपेक्षा राहुल गांधींना जास्त जण स्वीकारतात. समविचारी लोकांना एकत्र आणण्याबाबत राहुल यांनी चर्चाही केली असल्याचे पवार म्हणाले.