Sangli Samachar

The Janshakti News

".तर 10 ते 15 राज्यांतील भाजपची सरकारे कोसळतील"



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३ मे २०२४
केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टात दुरूस्ती करण्यात येईल. त्यामुळे पक्षबदलू अपात्र ठरतील. त्या स्थितीत भाजपची १० ते १५ राज्यांतील सरकारे कोसळतील, असे भाकित कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी गुरूवारी केले आहे. देशभरात फोडाफोडी करून भाजपने लोकशाहीची चेष्टा केली. मात्र, इंडियाची सत्ता केंद्रात आल्यानंतर पक्षांतराला बंदी घालणारे पाऊल उचलण्यात येईल. त्यामुळे ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलैपर्यंत भाजपची सरकारे कोसळतील, असा दावा खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना केला.


मागील काळात विविध राज्यांतील अनेक आमदारांनी आपापले पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पक्षांतराच्या सत्राचा ठपका खेडा यांनी भाजपवर ठेवला. तसेच, विविध राज्यांतील भाजपची सरकारे पक्षांतरावर आधारलेली असल्याकडे लक्ष वेधले. भाजपचे केंद्रीय नेते प्रचारासाठी गोव्यात येतील तेव्हा त्यांना पत्रकारांनी १० व्या परिशिष्टाविषयीचा प्रश्‍न विचारावा, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.