Sangli Samachar

The Janshakti News

नाना पटोले हे शरद पवार, उद्धव ठाकरेंसमोर बोलू शकत नाहीत - अशोक चव्हाण



सांगली समाचार - दि. ११ एप्रिल २०२४
नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी टाकले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर एक शब्दही नाना बोलू शकत नाहीत. त्यांच्यामुळे काँग्रेसच्या अनेक जागा शिवसेनेला गेल्या. यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. ज्या नेत्याने कधीही नेतृत्व केले नाही, जो कधी लोकांमध्ये गेला नाही अशा लोकांना मोठी पदे दिली तर अशीच अवस्था होणार, अशी खरमरीत टीका अलीकडेच भाजपवासी झालेले खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सांगलीचा तिढा कायम होता. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र सांगलीची जागा आजवर काँग्रेसची राहिली आहे. त्यामुळं काँग्रेसला मिळावी, यासाठी काँग्रेसकडून अथक प्रयत्न करण्यात आले होते. विश्वजीत कदम यांनी याबाबत पुढाकार घेत विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत दिल्लीपर्यंत धडक दिली होती. महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळेल, असा दावा केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतही शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र अखेर सांगलीची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वाट्याला गेलीय. काँग्रेसने अनेक जागा शिवसेनेला दिल्याने नाना पटोले यांच्या नेतृत्वावर अशोक चव्हाण यांनी टीका केली. नाना पटोले यांनी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी टाकले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर एक शब्दही नाना बोलू शकत नाही. त्यांच्यामुळे काँग्रेसच्या अनेक जागा शिवसेनेला गेल्या. यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे अशी टीका चव्हाण यांनी केली.


…म्हणून काँग्रेस सोडली

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळीही मी त्यांचा चाहता होतो. आज मोदींची दूरदृष्टी आणि त्यांचे काम पाहून मी भाजपात आलो आहे. त्याला मोदींविषयी आस्था आणि प्रेम आहे. मी विरोधाला केवळ विरोध करणारा नेता नाही. आणि भाजपमध्ये का गेलो हे सांगायला मला कमीपणाही वाटत नाही, असेही अशोक चव्हाण म्हणाले.