Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत पार पडलेला काँग्रेसचा मेळावा नेमका कशासाठी व कुणासाठी ?



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२५ एप्रिल २०२४
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार चरणसीमेवर असतानाच सांगलीत काँग्रेसचा मेळावा संपन्न झाला. मात्र या मेळाव्याने अनेक प्रश्न जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या मनात निर्माण झाले आहेत.

काँग्रेसचा हा मेळावा नेमका कशासाठी होता ? नाराजांची मनधरणी करण्यासाठी ? डॉ. विश्वजीत कदम व राज्यातील काँग्रेस नेत्यांभोवती शंकांचे मोहोळ निर्माण झाले होते, ते दूर करण्यासाठी ? की महाआघाडीतील मित्र पक्षांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी ? कारण या मेळाव्यात बंडखोर उमेदवार विशालदादा पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार, असेच सांगितले गेले होते. परंतु असे काहीही झाले नाही. उलट विशाल पाटील यांच्यावर विरुद्ध कोणीच काही बोलले नाही. त्यांना कुठलाही इशारा दिला गेला नाही. आणि म्हणूनच या मेळाव्याचे फलित काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे मुळात विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार ना जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांना आहे, ना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षांना. कारण विशाल पाटील यांची नेमणूक केंद्रीय नेतृत्वाने केले आहे. आणि कारवाईचा निर्णय केंद्रीय पातळीवरच होणार आहे. जिल्हा किंवा राज्यपातळीवरील संबंधित नेतृत्वाने विशाल पाटील यांच्या बंडखोरीबाबत आपला अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे द्यायचा आहे. त्यामुळे हा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला पोहोचेपर्यंत कदाचित निवडणूक पार पडेलही. नंतरची कारवाई केवळ औपचारिकता राहणार आहे.


दुसरी गोष्ट म्हणजे विशाल पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना पक्षाकडून उमेदवारी मागे घेण्याबाबत कोणताही लेखी आदेश आलेला नाही, त्यामुळे आपल्यावर कारवाई होईल असे वाटत नाही. आणि झाले ही तसेच. कारवाईचा निर्णय जाहीर करण्यात आजचा मेळावा संपन्न झाला. आणि कार्यकर्ते आपल्या मनात जो काही संदेश घेऊन जायचा होता, तो घेऊन ते मतदार संघात पोहोचलेली. आता आगामी काळात काँग्रेसचे नेते महाआघाडीचे उमेदवार पै. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात दिसतीलही. पण कार्यकर्ते काय करणार ? ते मनापासून पै. चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार का ? याचे उत्तर आगामी काळात दिसून येईल.