Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेसची सर्वात मोठी खेळी, आरक्षणाबाबत जाहिरनाम्यातून सर्वात मोठी घोषणा; भाजपला निवडणूक जड जाणार ?



सांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
नवी दिल्ली  - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच काँग्रेसने सर्वात मोठा डाव टाकला आहे. काँग्रेसने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या या जाहिरनाम्यातून 5 न्याय आणि 25 गॅरंटीवर फोकस टाकण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी हा निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे. यावेळी पी. चिदंबरमही उपस्थित होते. काँग्रेसच्या जाहिरनाम्यातून तरूण, महिला, शेतकरी आणि मजदूरांवरही फोकस टाकण्यात आला आहे. तसेच या जाहिरनाम्यातून आरक्षणावर मोठी घोषणा केली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत आरक्षणावर डाव टाकल्याने ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता वर्तवली जात असून भाजप आता काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून 5 न्यायाची आणि 25 गॅरंटीचे आश्वासन देण्यात आले आहे. या ऐतिहासिक गॅरंटी असून त्यामुळे देशातील लोकांचं आयुष्य बदलेलं असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. त्याचवेळी काँग्रेसने आपल्या घोषणांचा पेटारा उघडला आहे. काँग्रेसेच्या या पेटाऱ्यात शेतकरी न्याय, नारी न्याय, युवा न्याय, श्रमिक न्याय आणि भागीदारीच्या न्यायाचं आश्वासन देण्यात आलं आहे.


मोदी गॅरंटीवर कुरघोडी करण्यासाठी काँग्रेसनेही 25 गॅरंटी

मोदी गॅरंटीवर कुरघोडी करण्यासाठी काँग्रेसनेही 25 गॅरंटी दिल्या आहेत. ओपीसीचा वादा, गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये, महिलांना नोकरीत 50 टक्के आरक्षण देण्याची घोषणा जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन फॉर्म्युल्यानुसार एमएसपी कायदा लागू करण्याची गॅरंटी, श्रमिकांसाठी 25 लाखांचा आरोग्य बिमा, मोफत उपचार, डॉक्टर, औषधे, रुग्णालये, टेस्ट, सर्जरीबाबतच्या घोषणाही जाहीरनाम्यातून करण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना जमीन देण्याचं आश्वासनही या घोषणापत्रातून करण्यात आलं आहे.

न्यारी न्याय गॅरंटी

गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये

केंद्र सरकारच्या नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण

आशा, मिड डे मिल, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अधिक वेतन

प्रत्येक पंचायतीत एक अधिकार सहेली

नोकरदार महिलांसाठी हॉस्टेलची दुप्पट सुविधा

शेतकरी न्याय गॅरंटी

स्वामिनाथन फॉर्म्युल्यासह एमएसपी कायद्याची गॅरंटी

कर्जमाफी प्लान लागू करण्यासाठी आयोग

पिकांचे नुकसना झाल्यास 30 दिवसात पैसा ट्रान्स्फर

शेतकऱ्यांच्या आवश्यक गोष्टींवरील जीएसटी हटवणार

शेतकऱ्यांच्या सल्ल्यानुसारच नवीन आयात निर्यात धोरण आणणार

श्रमिक न्याय गॅरंटी

400 रुपये रोजंदारी, मनरेगातही लागू होणार

25 लाखाचा आरोग्य विमा, मोफत उपचार, रुग्णालय, डॉक्टर, औषध, टेस्ट आणि सर्जरी

शहरातही मनरेगासारखी नवीन पॉलिसी आणणार

असंघटीत कामगारांसांठी जीवन आणि दुर्घटना विमा

मुख्य सरकारी कार्यालयात काँट्रॅक्ट सिस्टिम बंद

50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार

अनेक राज्यात 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे अनेक घटकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाहीये. परिणामी अनेक राज्यात आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आरक्षणावरून मोठी घोषणा केली आहे. सत्ता आल्यास 50 टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्यात येईल. तसेच आरक्षणाची मर्यादाही वाढवण्यात येणार असल्याची घोषणा या जाहीरनाम्यातून करण्यात आली आहे. एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी एक संवैधानिक दुरुस्ती करण्यात येईल. ईडब्ल्यूएससाठी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्क्यांचं आरक्षण कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व जाती आणि समुदायांना लागू करण्यात येणार आहे. एक वर्षाच्या आत एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षित पदांचा बॅकलॉग भरण्यात येईल. ओबीसी, एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करण्यात येईल. त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाईल. पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ केली जाईल.

जातीनिहाय जनगणना करणार

काँग्रेस जाती आणि पोटजातींची आर्थिक, सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रव्यापी सामाजिक, आर्थिक आणि जातीनिहाय जनगणना करेल. त्यानंतर आलेल्या आकड्यांच्या आधारे योजना लागू करणार.