Sangli Samachar

The Janshakti News

प्रत्येकाला टाकला वडा, आला तळून असं वाटतंय; राज ठाकरे यांनी शायनर कार्यकर्त्यांना झापलं



सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
नाशिक  - महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात दरवर्षी आपण वर्धापन दिन साजरा करू. आज पक्षाला १८ वर्ष पूर्ण होत आहे. तुम्हाला राजकीय इतिहास सांगणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वडा टाकला की तळून आला पाहिजे. पण बटाटा शिजवावा लागतो, त्यात काही गोष्टी टाकायच्या असतात मग तळावा लागतो. ही सर्व प्रक्रिया आहे. फक्त आम्ही बटाटा टाकणार, तो तळून आला पाहिजे, असे होणार नाही. सर्व गोष्टी फास्टफूड लेव्हलला गेल्या आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेल.. राजकारणात वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर सर्वात मोठी गोष्ट लागते पेशन्स, असे मनसे नेते राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांचे हे बोल शायनर कार्यकर्त्यांसाठी होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १८ वर्ष पूर्ण होत आहे. नाशिकमध्ये हा वर्धापन दिन करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात वर्धापन दिन साजरा करायचे, असे आम्ही ठरवले आहे. पुणे, मुंबई, ठाणे अशा विविध शहरात यापूर्वी वर्धापन दिन साजरे झाले आहेत.


भाजपचे यश कधीपासून

इतर पक्षाचे यश तुम्हाला आता दिसतंय. आपल्याला वाटतं मोदींचं जे यश आहे, २०१४ साली आलेलं. ते पूर्ण यश मोदीं याचं आहे का?. त्यातील काही भाग मोदींचा असेल. पण त्याचं संपूर्ण श्रेय इतकी वर्षापासून त्यांचे जे कार्यकर्ते झटत आहे, त्यांचं आहे. १९५२ साली त्यांचा जनसंघ पक्ष स्थापन झाला. १९८० साली त्यांचं भाजप असं नामकरण झालं. १९५२ सालापासून अनेकांनी खस्ता खाल्ल्या. महाराष्ट्रात मोदी, मुंडे आणि वहाडणे, हशू आडवाणी. इतक्या लोकांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्यातून हे यश आलं आहे. अचानक आलं नाही. गेली १८ वर्ष मी अनेक चढउतार पहिले. चढ पेक्षा उतार जास्त पाहिले. यावेळी तुम्ही सर्व बरोबर राहिला. तुम्हाला मी यश मिळून देणार आहे. सत्ता मिळवून देणार आहे. परंतु त्यासाठी स्पेशन महत्वाचे आहे.

सोशल मीडिया कसा वापरावा

सोशल मीडिया आपण कसा वापरला पाहिजे. राजकारणासाठी त्याचा कसा वापर केला पाहिजे. लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचले पाहिजे? जे माध्यम इतकं महत्त्वाचं माध्यम आहे. तुमच्या हातात हे माध्यम आहे. त्याच्याशी तुम्ही खेळत असता त्याचं कसं राजकीयदृष्ट्या वापरलं पाहिजे? त्याचा उपयोग पक्षाला होऊ शकेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.