Sangli Samachar

The Janshakti News

आठवीपर्यंतची ढकलगाडी आता बंद



सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४
पुणे - दहावीची परीक्षा संपल्यानंतर एप्रिलच्या दुसऱया आठवडय़ात पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात फेरपरीक्षा होणार आहे.या वार्षिक परीक्षेसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार कराव्यात, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एमएससीईआरटी) दिल्या आहेत.

शालेय शिक्षणात पहिली ते पाचवी प्राथमिक तर सहावी ते आठवी उच्च प्राथमिक असे गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटाच्या शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या सूचना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्या होत्या. त्यानुसार पाचवी आणि आठवीच्या यंदापासून वार्षिक परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेआधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. सदर परीक्षेसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या अधिकच्या सरावासाठी एमएससीईआरटीच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी आपापल्या स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षांचे आयोजन करावे, अशा सूचना एमएससीईआरटीने दिल्या आहेत.




आठवीपर्यंतच्या सर्वच पास करण्याच्या तरतुदीत सुधारणा.
पाचवी आणि आठवीसाठी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा 10 गुण, लेखी परीक्षा अनुक्रमे 50 आणि 60 गुणांची.
वार्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गरजेनुसार सवलतीचे गुण, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन.
सवलतीचे कमाल 10 गुण. एका विषयासाठी कमाल 5 गुण.
पाचवीसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास 1-2 यावर आधारित परीक्षा.
आठवीसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रs यावर आधारित परीक्षा.
पाचवीत पास होण्यासाठी प्रति विषय किमान 18 गुणे (35 टक्के) आवश्यक.
आठवीत पास होण्यासाठी प्रति विषय किमान 21 गुण (35 टक्के) आवश्यक.
परीक्षेला गैरहजर राहिल्यासही विद्यार्थी नापासच, मात्र फेरपरीक्षेची संधी मिळणार
फेरपरीक्षा जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार.