Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्ह्यातील ४०० दुबार शाळा अडचणीत, खासगी शाळांना दणका



सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
सांगली - पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतच्या वर्गाची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे दोन सत्रांमध्ये चालणाऱया शाळांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सरकारच्या या निर्णयाने जिह्यातील खासगी माध्यमाच्या तब्बल ४०० हून अधिक शाळा अडचणीत आल्या आहेत. उपलब्ध खोल्यांमध्ये सगळे वर्ग कसे भरवायचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे, असा प्रश्न शाळांना भेडसावत आहे.

सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर सुरू करण्याचा निर्णय आता राज्यात लागू होणार आहे. अनेक शाळांमध्ये पूर्वप्राथमिक आणि प्राथमिकचे वर्ग सकाळी भरतात, तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे वर्ग दुपारच्या सत्रात घेण्यात येतात. यामुळे उपलब्ध वर्गखोल्यांमध्ये सर्व वर्ग भरविणे शाळांना शक्य होते. आता नव्या वेळापत्रकामुळे या दोन्ही सत्रांतील वर्गाच्या वेळेचा संघर्ष होणार आहे. सकाळचे सत्र संपायच्या आधी दुपारचे सत्र सुरू होणार आहे. एकाच वेळी इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल इतक्या वर्गखोल्या अनेक शाळांकडे नाहीत. या अडचणीवर कसा मार्ग काढावा, याची चर्चा शाळांमध्ये सुरू झाली आहे. शाळांचे वेळापत्रक आणि सुविधा कशा सांभाळाव्यात, याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे.




शासनाने चौथीपर्यंतच्या वर्गांसाठी नवा निर्णय घेतला आहे. मात्र, नव्या शिक्षण आराखडय़ानुसार अनेक शाळांमध्ये पाचवीचा वर्गही प्राथमिक शाळेला जोडला आहे. अशा परिस्थितीत चौथीपर्यंत वेगळी वेळ आणि केवळ एका पाचवीच्या वर्गासाठी वेगळी वेळ असे त्रांगडे निर्माण होणार आहे. जेथे पाचवीचा वर्ग आहे, तेथे शासनाचा निर्णय लागू होणार का? तसेच हा निर्णय आम्हाला लागू होतच नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा दररोज दुपारच्या सत्रातच घेतल्या जातात. त्यामुळे या निर्णयाचा ग्रामीण भागातील शाळांवर परिणाम होणार नाही. शहरी आणि ग्रामीण भागांतील सीबीएसई, तसेच राज्य मंडळाच्या खासगी शाळांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे. दरम्यान, अनेक शाळा सध्याही नऊ वाजल्यानंतरच सुरू होत असल्याने त्यांच्यासाठी फारसा फरक पडणार नाही.

विद्यार्थ्यांच्या सवयी बिघडविणारा निर्णय

राज्य शासनाचा निर्णय हा विद्यार्थ्यांची लवकर उठण्याची चांगली सवय बिघडविणारा असल्याची टीकाही काही शाळाप्रमुखांनी केली आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांना लवकर उठायची सवय लागते. त्यानंतर शाळेत सकाळी लवकर त्यांचे शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आणि विकासावर होतो. लवकर उठणे चांगले की वाईट ? असा प्रश्न निर्माण करणारा हा निर्णय आहे. या शाळांप्रमाणेच अनेक पालकांनीही उशिरा शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.