Sangli Samachar

The Janshakti News

'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' नारा हवेत विरला; हजारो कोटींच्या खाण घोटाळ्यातील आरोपीला भाजपात प्रवेश दिला...



सांगली समाचार  - दि. २६ मार्च २०२४
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' हा नारा हवेत विरला आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासोबतच सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भाजपमध्ये आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या आणि या प्रकरणी तुरुंगवासही भोगलेल्या कर्नाटकच्या माजी मंत्र्याने प्रवेश केला आहे. कर्नाटकच्या गंगावती मतदारसंघाचे कल्याण राज्य प्रगती पक्षाचे (केआरपीपी) आमदार जनार्दन रेड्डी यांनी पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश केला. हे जवळपास दोन दशक भाजपमध्ये सक्रिय होते. मात्र खाण घोटाळ्यात सीबीआयने अटक केल्यानंतर ते राजकारणातून बाद झाले. पुढे जामिनावर बाहेर आल्यानंतर 2022मध्ये त्यांनी भाजपपासून वेगळे होते नवीन पक्षाची स्थापना केली होती. विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. आता त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलिन केला आहे.

2011मध्ये अवैध खाणकाम आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जनार्दन रेड्डी यांचे नाव आले होते. रेड्डी हे भाजपचे तत्कालिन मंत्री श्रीरामुलु यांचे जवळचे सहकारी होते. सीबीआयने कर्नाटकातील बेल्लारी आणि आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे हजारो कोटींचा खाण घोटाळा केल्याप्रकरणी अटक केली होती. तुरुंगात असतानाही हायकोर्टाच्या न्यायाधीशांना लाच देऊन सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. चार वर्ष तुरुंगात काढल्यानंतर 2015 मध्ये ते जामिनावर बाहेर आले होते. सर्वोच्च न्यायालयाने अटी-शर्तींसह त्यांना जामीन दिला होता. न्यायालयाने त्यांच्याकडून हमीपत्र घेतले होते, तसेच देशाबाहेर जाण्यासही मज्जाव केला होता.