Sangli Samachar

The Janshakti News

'सकाळी आपल्यासोबत चहा प्यायला उपस्थित असलेला नेता दुपारी आपल्यासोबत असेल की नाही याची शाश्वती देता येत नाही - मुख्यमंत्री



सांगली समाचार - दि. १ मार्च २०२४
मुंबई  - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल  शुक्रवारी (1 मार्च) शेवटचा दिवस होता, अंतरिम अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विकास प्रकल्पांची माहिती दिली. तसेच विरोधकांवर सुद्धा जोरदार निशाणा साधला आहे.

नव्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर मुख्यमंत्र्यांचे भाष्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवार योजना भाग 2 अंतर्गत 5700 गावांसाठी, 1 लाख 59 हजार 886 कामांना मंजूरी दिली आहे. वर्सोवा - वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत करणार आहोत. कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक, सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाचं भूसंपादन सुरू करत आहोत. छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळाच्या विस्तारिकरणासाठी भूसंपदानासाठी निधीची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 1 लाख महिलांना विशेष शासकीय योजनांचा लाभ.

म्हणून विरोधकांचे चित्रपट फ्लॉप

सरकारकडून सुरू असलेल्या कामांबाबत तुम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे तुम्ही कबूल करत शकत नाहीत. पण चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे. विरोधकांची स्क्रिप्ट एकच असते. एकच स्क्रिप्ट, एकच ड्राफ्ट असतो. एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो आणि त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चालले आहेत असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवतो. आम्हाला खोके-खोके म्हणणाऱ्यांनीच आमच्या शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी रुपये घेतले. त्यांची आता चौकशी सुरू आहे. शिवसेना आमच्याकडे आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. खोके पुरत नाहीत म्हणून कंटेनर... असं मी नाही पण कुणीतरी बोललं आहे असंही एकनाथ शिंदे म्हणाले.



वडेट्टीवार तावातावाने बोलत होते, आता कुठे गेले?

विरोधी पक्षनेते कुठे गेले एवढे जोरजोरात बोलून? मी त्यांचं भाषण सुरू होतं म्हणून मी मुद्दाम आलो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यानंतर काही सेकंदांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, तुमचं भाषण सुरू होतं म्हणून मी आलो.. म्हटलं कुठे गेले जोरजोरात भाषण करत होते?

विरोधी पक्षाने राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत, राज्यातील अडचणींबाबत अधिवेशनात मुद्दे मांडण्याची गरज होती. पण विरोधी पक्ष केवळ टीका करत आहे. आम्ही अंतरिम अर्थसंकल्प मांडला तरी सुद्धा विरोधी पक्षांचा व्यर्थ संकल्प सुरूच होता असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय

विरोधकांपैकी काही जण सभागृहात बोलण्याऐवजी बाहेर माध्यमांसमोर बोलतात. काहीजण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहात हजेरी लावतात. महाविकास आघाडीची वज्रमूठ असल्याचं काहीजण म्हणायचे. फोटो काढताना हातात हात असायचे आणि प्रत्यक्षात पायात पाय... असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आमच्या महायुतीत अशोक चव्हाण आले आहेत. आणखी काय-काय होईल त्याची चिंता विरोधकांना आहे. त्यामुळे सकाळी आपल्यासोबत चहा प्यायला असलेला नेता दुपारी आपल्यासोबत असेल की नाही याची गॅरंटी विरोधकांना नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.