Sangli Samachar

The Janshakti News

मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवली तर स्वाभिमानीचा पाठींबा !

 


सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४

वडीगोद्री - मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील जालना मतदार संघातून लोकसभेची निवडणूक  स्वतंत्र पणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे. 

“शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने रस्त्यावरती येऊन संघर्ष केला व संसदेत जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबर कायदेमंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचे असल्यास त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी. 

आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जन आंदोलन उभे करून सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पाडता येते. आजपर्यंत अनेक जनआंदोलनांनी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले आहे. या जनआंदोलनातले काही लोकप्रतिनिधी हे जर कायदेमंडळात असतील तर त्या आंदोलनाला अधिक धार येते. कमी संघर्षामध्ये, रक्त न सांडता जनतेचे म्हणणे सरकारकडून मान्य करून घेता येते. राजू शेट्टी यांनी कायदेमंडळात जाऊन उसाच्या एफआरपीचा विषय सरकारकडून मान्य करून घेतला. चुकीचे भूमीअधिग्रहण बिल संसदेतून उधळून लावले हे केवळ राजू शेट्टी लोकसभेत होते म्हणून शक्य झाले. म्हणून रस्त्यावरच्या संघर्षाबरोबर कायदेमंडळामधली लढाई खूप महत्त्वाची आहे,” असे जगताप यांनी म्हटले आहे. 

आज जरांगे पाटील हे मराठा बहुजनांचे नेते म्हणून लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती आहेत. रस्त्यावरती त्यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा हा अलौकिक आहे. परंतू या लढ्याला आजही पूर्ण यश मिळाले नाही. कायदेमंडळात नवीन कायदा झाल्याशिवाय मराठा समाजाला कायमचे टिकणारे आणि योग्य आरक्षण मिळणे अशक्य आहे. यासाठी कायदेमंडळामध्ये मनोज जरांगे पाटलांसारखा प्रतिनिधी असायला हवा. असे आमचे प्रामाणिक मत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही आघाडीत न जाता स्वतंत्रपणे समाजाच्या ताकदीवर लोकसभेची निवडणूक लढवावी, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.