Sangli Samachar

The Janshakti News

उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना नेत्यांना होतोय पश्चाताप ?...



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अद्याप काही जागांवर तिढा कायम आहे. दोन ते तीन जागांवरून महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम असल्याचे सांगितलं जात आहे. तर काही जागांवर चक्क महायुतीत शिंदे गटाच्या खासदारांना तिकीट मिळालं नाही. महायुतीत शिंदे गटाच्या खासदारांची तिकीटे कापली जात असल्याने शिंदे गटामध्ये अंतर्गत नाराजीचा सूर पसरला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्ष स्वत:कडे घेत आहेत, या माध्यमातून खच्चीकरण करत असल्याची चर्चा पक्षातील नेत्यांमध्ये सुरु आहे. लोकसभेतील विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने ठाकरेंची साथ सोडून युतीत सहभागी झाल्यानंतर ऐनवेळी अशी वागणूक मिळत असल्याने शिंदे गटात अंतर्गत नाराजी पसरली आहे.

शिंदे गटातील नेत्यांचं म्हणणं काय?

महायुतीतील चर्चेला फक्त शिंदे गटाकडून फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलावलं जातं. तर राष्ट्रवादीतून अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित असतात. भाजपबाबत होत असलेल्या जागेच्या वाटाघाटीत पक्षातील नेत्यांना दूर ठेवत असल्याने पक्षातील नेते नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत अशी परिस्थिती आहे, तर विधानसभा निवडणुकीला काय होणार, भविष्याच्या चिंतेने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही कारणामुळे ठाकरेंची साथ सोडली, त्याच्या उलट कृती होत असल्याने आमदारांमध्ये चिंता पसरली आहे.

शिंदे गटाचे खासदार नाराज?

दरम्यान, छगन भुजबळ यांचं नाव नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आल्याने हेमंत गोडसे नाराज असल्याची माहिती समोर आली. दुसरीकडे यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याने भावना गवळी नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर जागावाटपासंदर्भात शिंदे गटात नाराजीनाट्य सुरु आहे.