Sangli Samachar

The Janshakti News

शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज मिळणार, 9000 मे. वॅट सौरऊर्जा योजनेचा करार



सांगली समाचार - दि. ८ मार्च २०२४
मुंबई  - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळणार आहे. त्यामुळे रात्रीअपरात्री शेतीचे पंप सुरु ठेवण्यासाठीचा खटाटोप संपणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज मिळत नाही. त्यामुळे त्यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी पुरवठा ककरावा लागतो. रात्रीच्या वेळी शेताकडे जाताना बिबटे अन्य जनावरांकडून शेतकऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. यामुळे दिवसाचा संपूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करण्याची मागणी होत आहे. अशात आता सरकारने राज्यातील कृषी क्षेत्रासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवसाचा देखील वीज पुरवठा पुरेशा क्षमतेने होणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री सौर कुषी वाहीनी योजना 2.0 सुरु करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हुडको सोबत करार करण्यात आला.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यात लोडशेडींग आणि इतर कारणाने दिवसाचा वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी पंप सुरु करावे लागतात, त्यामुळे अनेकदा अपघात तसेच जंगली पशूपासून हल्ले देखील होत असतात, परंतू आज शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 9000 मे.वॅटच्या कामाचे देकार पत्र जारी करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषि वाहीनी योजना 2.0 अंतर्गत 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.


25,000 रोजगार निर्मिती

राज्यात दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहीनी योजना 2.0 योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत 40 हजार कोटीची गुंतवणूक होऊन 25000 रोजगारांची निर्मिती होणार आहे. तसेच साल 2025 मध्ये 40% कृषी फिडर सौर ऊर्जेवर येणार आहेत. 18 महिन्यात प्रकल्प पूर्ण करायचा आहे. पण सोबत काम केले तर 15 महिन्यात देखील काम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना या योजनेत 1.25 लाख रुपये प्रति हेक्टर वार्षिक भाडे मिळणार आहे.
उद्यापासून उर्वरित कृषि फिडर सौर ऊर्जेवर कसे येतील, याचे नियोजन सुरू करा, आता थांबू नका, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांना 8 लाख सौर ऊर्जा पंप सुद्धा द्यायचे आहेत असे त्यांनी सांगितले.