Sangli Samachar

The Janshakti News

सत्तेत आल्यास हमीभाव कायदा करू; राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी 5 मोठी आश्वासने!



सांगली समाचार - दि. १६ मार्च २०२४
नवी दिल्ली - देशातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या  तारखा 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जाणार आहे. अशातच आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (आयएनसी) नेते राहुल गांधी ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाच मुद्द्यावर मोठे आश्वासन जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सध्या नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी ही आश्वासने जाहीर केल्याने त्यांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

'ही' आहेत काँग्रेसची पाच आश्वासने

सत्तेत आल्यास आश्वासने पूर्ण करणार
70,000 कोटींची कृषी कर्जमाफी
'ही' आहेत काँग्रेसची पाच आश्वासने
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार देशभरात हमीभाव कायदा (MSP Guarantee Act) लागू केला जाईल. अर्थात पंजाब व हरियाणाचे आंदोलनकर्ते शेतकरी सध्या हीच प्रमुख मागणी करत आहे.
देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम निर्धारीत करण्यासाठी देशपातळीवर एक कायमस्वरूपी 'कृषी कर्जमाफी आयोग' स्थापन केला जाईल.
पीक विमा योजनेमध्ये बदल करून, पीक नुकसानीनंतर 30 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीची रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाईल.
शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून, त्यानुसार कृषी मालाचे आयात-निर्यात धोरण राबवले जाईल.
कृषी उत्पादनावरील जीएसटी हटवला जाईल. ज्याद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त केले जाईल.


सत्तेत आल्यास आश्वासने पूर्ण करणार

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कॉग्रेस आघाडीचे सरकार केंद्रात स्थापन झाल्यास, काँग्रेस पक्षाकडून ही पाच आश्वासने पूर्ण केली जातील. असेही राहुल गांधी यांनी पक्षाच्या कृषी विषयक मुद्द्याच्या आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्यामुळे आता एका बाजूला गुरुवारी (ता.14) आपल्या मागण्यांबाबत शेतकरी संघटनांनी नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर महापंचायत भरावली होती. त्याचवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमांद्वारे ही पाच कृषी विषयक आश्वासने जाहीर केल्याने, त्यास महत्व प्राप्त झाले आहे.

70,000 कोटींची कृषी कर्जमाफी

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मागील काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांचे जवळपास 70,000 कोटींचे कृषी कर्ज माफ करण्यात आले होते. सध्या जर देशातील धनदांडग्यांचे कर्ज माफ केले जात असेल. तर देशातील शेतकऱ्यांचे देखील कर्ज माफ झाले पाहिजे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाच प्रमुख मुद्द्यांना राहुल गांधी यांनी साद घातल्याने, काँग्रेस पक्षाला नेमका याचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान किती फायदा मिळेल? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.