Sangli Samachar

The Janshakti News

मराठा समाजाने पंतप्रधान मोदींविरोधात शड्डू ठोकला; वाराणसीतून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करणार



सांगली समाचार - दि. ६ मार्च २०२४
परभणी - गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात प्रत्येक गावातील दोन उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. उमेदवारीवरुन बीड, नांदेड अशा प्रत्येक जिल्ह्यातही बैठका पार पडल्या होत्या. दरम्यान, आता परभणीतील बैठकीत मराठा समाजाकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मराठा समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारी आहे. कारण वाराणसी मतदारसंघात देखील परभणीतील मराठा समाज एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. याबाबत मराठा समाजकडून ठराव मंजूर करण्यात आलाय.

परभणीतील मराठा बैठकीत काय ठरलं?

परभणी शहरातील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज परभणीतील मराठा समाजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध संघटनाचे पदाधिकारी,मराठा बांधव मोठ्या संख्येने उपास्थित होते. यावेळी जिल्ह्यातून एक हजार मराठा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी परभणीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. वाराणसी पाठोपाठ राहुल गांधी, बारामती आणि ठाणे या चार मतदार संघात मराठा समाज बांधव उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. येणाऱ्या दिवसात राजकारणासाठी गाव बंदी पाठोपाठ घर बंदी करण्याचा ठराव ही मंजूर करण्यात आला आहे.


तर, मराठा समाज सरकारला घेरणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरे दाखल्यांची अंमलबजावणी झाला नाही तर प्रत्येक मतदारसंघात 2 हजार उमेदवार देणार, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाही तर राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात देखील मराठा समाज उमेदवार देणार आहे.

प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे फक्त मराठा समाजातीलच उमेदवार नाही तर इतर समाजातील देखील लोकांना या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभे करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये मराठा समाजचं सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. जोपर्यंत सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मराठा समाज कोणत्याही नेत्याच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याचा इशाराही मराठा समाजाने दिलाय.