Sangli Samachar

The Janshakti News

भुयारी मार्गाने थेट अरबी समुद्रात नेणारा अद्भूत किल्ला !




सांगली समाचार  दि. ०८|०२|२०२४

रत्नागिरी - महाराष्ट्र म्हणजे गड -किल्ल्यांचे राज्य… राज्यातल्या अनेक भागात इतिहासकालीन गड -किल्यांनी आजही आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. आजही हे किल्ले इतिहासाची साक्ष देतात.

दुसरी महत्वाची आणि आश्चर्यचकित क्राऊन टाकणारी गोष्ट म्हणेज या किल्ल्यांची रचना. आता आपल्या कोकणातल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचीच गोष्ट पहा ना आजही हा किल्ला विशाल समुद्रात ठामपणे उभा आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला कोकणातल्या आहे एका किल्ल्याविषयी सांगणार आहोत ज्याचे गुप्त मार्ग तुम्हाला नक्कीच बुचकळ्यात पाडतील चला तर मग जाणून घेऊया…

हो ! तर आम्ही बोलत आहोत रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्याविषयी… या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात एक छुपा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो. हा रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहरापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावरच आहे. रत्नागिरी शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांना हा किल्ला म्हणजे मुख्य आकर्षण वाटतो. विशेष म्हणजे या किल्ल्याच्या तीनही बाजूने अरबी समुद्र वेढला आहे. या किल्ल्याच्या आग्नेयला जमीन तर किल्ल्याच्या पायथ्याशी मिरकर वाडा हे बंदर आहे. या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नाले सारखा तर किल्ल्यावरून दिसणारा सुंदर समुद्र इथल्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.

या किल्ल्याचे क्षेत्रफळ हे 120 एकर इतका आहे. किल्ल्याची लांबी अंदाजे 1300 m आणि रुंदी 1000 m आहे तर किल्ल्याच्या दक्षिण पूर्वेकडून पश्चिमेकडे मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या मध्यभागी एक मुख्य प्रवेशद्वारे एका बुरुजावर दीपगृह आहे. या बुरुजाला सिद्ध बुरुज असं म्हटलं जातं. किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असलेलं भगवतीचे मंदिर हे शिवकालीन आहे. याच्या बाले किल्ल्याला नऊ बुरुज आहेत तर संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. हा किल्ला बालेकिल्ला आणि दीपगृह तसेच किल्ला पेठ अशा तीन भागांमध्ये विभागला गेला आहे. या किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह आहे.

या किल्ल्यावर तीन तोंडाचा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग पर्यटकांसाठी सध्या बंद आहे. मात्र हा भुयारी मार्ग समुद्रात बाहेर पडतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारा कडे येताना लागणाऱ्या तटबंदीवरून या भुयाराचा शेवट खाली समुद्रकिनारावर ज्या ठिकाणी होतो तिथं असलेलं गुहेसारखं भुयार हे स्पष्ट दिसतं.

बहामनी राजवटीत हा किल्ला बांधला गेलाय त्यानंतर आदिलशहाने हा किल्ला ताब्यात घेतला यानंतर 1670 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहाच्या ताब्यातून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. संभाजीराजेंनी या किल्ल्यावर काही काळ वास्तव्य केलं. त्यानंतरच्या काळात हा किल्ला करवीर छत्रपतींच्या ताब्यात गेला. त्यानंतर हा किल्ला आंग्रे कुटुंबीयांच्या ताब्यात आला. आंग्रे सोबतच्या युद्धात पेशव्यांनी हा किल्ला जिंकला पण शेवटी 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. असा या किल्ल्याचा इतिहास आहे.

तुम्हाला या किल्ल्यावर जायचं असेल तर जवळचे रेल्वे स्थानक रत्नागिरी आहे रत्नागिरी शहरातून रिक्षा पकडून थेट किल्ल्यापर्यंत जाता येते किल्ला जवळ राहण्याची आणि जेवणाची मात्र सोय नाही हि बाब लक्षात घेण्यासारखी आहे.