Sangli Samachar

The Janshakti News

शिंदे समितीच्या सर्वेक्षणावर नरेंद्र पाटील कडाडले : रस्त्यावर उतरण्याचा इशारा





सांगली समाचार - दि. १३|०२|२०२४

मुंबई - मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु असून, यासाठीच सरकराने शिंदे समितीचे स्थापना केली आहे. मागील दोन महिन्यापासून या शिंदे समितीच्या वतीने काम करण्यात येत आहे.

मात्र, याच शिंदे समितीच्या सर्वेक्षणाच्या कामकाजावर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील  यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. शिंदे समितीच्या वतीने होणाऱ्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख करण्यात आला असून, सरकराने यात तात्काळ सुधारणी करावी अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे. अन्यथा आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील पाटील यांनी दिला आहे. 

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील बनला असून, हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. मनोज जरांगे यांच्याकडून देखील उपोषण करण्यात येत आहेत. अशात मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागील काही दिवसांत सरकराने वेगवेगळे निर्णय घेतले असून, यापैकी एक म्हणजे शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. याच शिंदे समितीने निजामकालीन मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम देखील केले आहे. त्यामुळे राज्यात 52 लाख पेक्षा अधिक नोंदी सापडलाय आहेत. मात्र, याच शिंदे समितीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, समितीच्या वतीने होणाऱ्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नरेंद्र पाटील यांनी एकप्रकारे सरकारला घरचा आहेर दिला आहे. 




अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल...

दरम्यान यावर बोलतांना, "माथाडी कामगार मराठा नसेल तर अण्णासाहेब पाटील यांनी उभारलेल्या मराठा आरक्षण लढ्यात माथाडी कामगार त्यांच्या पाठीमागे उभा राहिलाच कसा?, असा प्रश्न देखील नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ सर्वेमध्ये सुधारणा कराव्यात अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी सरकारला दिला आहे. नवी मुंबईत माथाडी भवन येथे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आयोजीत बैठकीत नरेंद्र पाटील यांनी हा इशारा दिला आहे. 

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस...

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकराने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरु केले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. तसेच, मागील तीन दिवसांत त्यांनी पाण्याचा गोठ देखील घेतला नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. सोबतच उपचार घेण्यास देखील नकार दिला आहे.