Sangli Samachar

The Janshakti News

खर्चिक नव्या योजनेऐवजी विद्यमान योजनेतून शुध्द व मुबलक पाणी देण्याचे प्रयत्न

सांगली समाचार  - दि. २८|०२|२०२४

सांगली : कोट्यावधी खर्चाची नवीन योजना अंमलात आणण्याऐवजी कृष्णेतील पाण्यावर अद्यावत शुध्दीकरण प्रकल्प बसवून सांगलीकरांना शुध्द व मुबलक पाणी देण्याचा महापालिका कसोशीने प्रयत्न करत असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. 

आज महापालिकेच्या वसंतदादा पाटील सभागृहात पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, सर्व सामान्य नागरिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेकांनी सांगलीतील पाणी प्रश्न बाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली आहे. त्यानंतर आयुक्त सुनील पवार यांनी गेल्या आठवडाभरात सुरू असलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली व सांगलीकरांच्या हितासाठी जनतेच्या हातात हात घालून काम करूया असे भावनिक आवाहन केले. ५६ एमएलडी प्रकल्प अद्यावत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

यावेळी नागरीक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी पाणी पुरवठा योजनेतील त्रुटीबाबत वारंवार निवेदन दिली, मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. विभागाकडील कर्मचारी योग्य काम करतात का, पाणी मीटर बंद असल्यावर दुप्पट पाणी बिल आकारणीचा निर्णय घेतला, मात्र बोगस नळजोडणी शोधली आहे का, गळती नेमकी कुठे होते याची पडताळणी का केली जात नाही अशी विचारणा केली.

उपायुक्त वैभव साबळे यांनी सद्यस्थिती काय आहे याची माहिती दिली. बैठकीस उपायुक्त पंडित पाटील, पृथ्वीराज पवार, रोहिणी पाटील, उर्मिला बेलवलकर, विष्णू माने, हणमंतराव पवार, पद्माकर जगदाळे, आनंदा लेंगरे, जयश्री पाटील, उत्तम कांबळे, सुजित काटे, सर्जेराव पाटील, मयूर घोडके, माधुरी वसगडेकर, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.